‘कोमसाप’चे सप्टेंबरमध्ये जिल्हा साहित्य संमेलन, रत्नागिरी जिल्ह्याची नवीन कार्यकारिणी जाहीर

By अरुण आडिवरेकर | Updated: July 24, 2023 15:54 IST2023-07-24T15:52:11+5:302023-07-24T15:54:08+5:30

रत्नागिरी : कोकण मराठी साहित्य परिषदेतर्फे येत्या सप्टेंबरमध्ये रत्नागिरी जिल्हा साहित्य संमेलन आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, ...

Ratnagiri District Literary Conference in coming September by Konkan Marathi Sahitya Parishad | ‘कोमसाप’चे सप्टेंबरमध्ये जिल्हा साहित्य संमेलन, रत्नागिरी जिल्ह्याची नवीन कार्यकारिणी जाहीर

‘कोमसाप’चे सप्टेंबरमध्ये जिल्हा साहित्य संमेलन, रत्नागिरी जिल्ह्याची नवीन कार्यकारिणी जाहीर

रत्नागिरी : कोकण मराठी साहित्य परिषदेतर्फे येत्या सप्टेंबरमध्ये रत्नागिरी जिल्हा साहित्य संमेलन आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, कोमसापच्या रत्नागिरी जिल्ह्याची नवीन कार्यकारिणीही जाहीर करण्यात आली आहे.

कोकण मराठी साहित्य परिषदेच्या रत्नागिरी जिल्हा मंडळाची कार्यकारिणी सभा जिल्हाध्यक्ष प्रा. आनंद शेलार यांच्या अध्यक्षतेखाली आणि कोमसापचे विश्वस्त प्रमुख रमेश कीर, विश्वस्त अरुण नेरुरकर, केंद्रीय अध्यक्षा नमिता कीर, गजानन तथा आबा पाटील, कार्यवाह माधव अंकलगे, कोकण मराठी साहित्य परिषद युवाशक्तीचे जिल्हाध्यक्ष अरुण मोर्ये यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. यावेळी झालेल्या रत्नागिरी जिल्हा कार्यकारिणीच्या बैठकीला जिल्ह्यातील शाखांचे अध्यक्ष, जिल्हा प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

केंद्रीय अध्यक्षा नमिता कीर म्हणाल्या की, नव्या कार्यकारिणीच्या पदाधिकाऱ्यांनी संपूर्ण जिल्ह्यात कोमसापचे कार्य कसे वाढेल यादृष्टीने प्रयत्नशील राहण्याची आवश्यकता आहे. वर्षभरात विविध कार्यक्रमांचे नियोजन करून जिल्ह्यातील साहित्यिकांना कोमसापच्या प्रवाहात आणण्यासाठी काम करण्याची गरज आहे, असे त्यांनी सांगितले. नूतन अध्यक्ष आनंद शेलार यांनी जिल्ह्यात कोमसापचे संघटन मजबूत करण्याचे काम यापुढील काळात करण्यात येईल, असा विश्वास व्यक्त केला.

विश्वस्त प्रमुख रमेश कीर आणि अरुण नेरुरकर यांनीही मार्गदर्शन करताना कोमसापने आतापर्यंत मोठ्या प्रमाणात साहित्य चळवळ प्रवाहित ठेवण्यासाठी कार्य केले आहे. भविष्यात कोमसापच्या कार्यकर्त्यांनी नकारात्मक बाबीकडे दुर्लक्ष करून सकारात्मक विचाराने प्रेरित होऊन कार्य करताना युवा पिढीला प्राधान्य दिले पाहिजे, असे सांगितले.

या सभेला लांजा शाखाध्यक्ष रामचंद्र जाधव, राजेश गोसावी, गुहागर शाखाध्यक्ष शाहिद खेरडकर, गुहागर शाखेचे प्रा. बाळासाहेब लबडे, राजापूरचे विनोद मिरगुले, खेडचे गोविंद राठोड, मालगुंड शाखेच्या अध्यक्षा नलिनी खेर, मालगुंड शाखेचे प्रतिनिधी गजानन पाटील, रत्नागिरी शाखेचे सचिव सुनील चव्हाण, खेड शाखेचे जलील राजपूरकर उपस्थित होते. राजापूर शाखाध्यक्ष वासुदेव तुळसणकर आणि रत्नागिरी शाखा अध्यक्षा तेजा मुळ्ये यांनी सभेतील निर्णयांना पाठिंबा असल्याचे लेखी पत्राद्वारे कळविले होते. केंद्रीय कार्यवाह माधव अंकलगे यांनी आभार मानले.

नूतन कार्यकारिणी

उपाध्यक्ष - गोविंद राठोड, वासुदेव तुळसणकर, सचिव - राजेश गोसावी, सहसचिव - विनोद मिरगुले, खजिनदार- शाहिद खेरडकर, केंद्रीय प्रतिनिधी- बाळासाहेब लबडे.

Web Title: Ratnagiri District Literary Conference in coming September by Konkan Marathi Sahitya Parishad