रत्नागिरीतील धोकादायक धरणांमधील पाणी सोडणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2019 14:31 IST2019-07-09T14:29:16+5:302019-07-09T14:31:25+5:30
जिथे गळतीमुळे धरणांना धोका उद्भवू शकतो, अशा धरणांमधील पाणी कालव्यांमधून सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या धरणांची तत्काळ पाहणी करून हा निर्णय घेतला जाईल. त्यासाठी लोकांना कल्पना देऊनच या हालचाली केल्या जातील, अशी माहिती जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी लोकमतला दिली.

रत्नागिरीतील धोकादायक धरणांमधील पाणी सोडणार
रत्नागिरी : जिथे गळतीमुळे धरणांना धोका उद्भवू शकतो, अशा धरणांमधील पाणी कालव्यांमधून सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या धरणांची तत्काळ पाहणी करून हा निर्णय घेतला जाईल. त्यासाठी लोकांना कल्पना देऊनच या हालचाली केल्या जातील, अशी माहिती जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी लोकमतला दिली.
चिपळूण तालुक्यातील तिवरे धरण फुटल्यामुळे आता अन्य धरणांबाबतही प्रशासन अधिक सतर्क झाले आहे. अशी दुर्घटना भविष्यात कोठेही घडू नये, यासाठी काही तातडीचे उपाय हाती घेण्यात आले आहेत. पाऊस पडत असल्याने सद्यस्थितीत कोणत्याही धरणाची दुरूस्ती शक्य नाही.
त्यामुळे आता जी धरणे धोकादायक ठरण्याची शक्यता आहे, अशा धरणांमधील पाणी सोडले जाणार आहे. प्रत्येक जिल्ह्यात पाटबंधारे खात्यातील अधिकाऱ्यांची डॅम सेफ्टी ऑर्गनायझेशन असते. जिल्ह्यातील सर्व धरणांची पाहणी करण्याची सूचना या समितीला देण्यात आली असल्याचे चव्हाण यांनी सांगितले.
धोकादायक ठिकाणचे पुनर्वसन
जिथे जिथे धरण क्षेत्रात लोकवस्ती आहे आणि जिला धोका होऊ शकतो, अशा ठिकाणच्या लोकांचे कायमस्वरूपी पुनर्वसन करण्यावरही भर दिला जाईल. मुळात त्यांच्या काही अडचणी आहेत का? त्यांना पुनर्वसनासाठी जागा देऊन झाली आहे का, हे तपासून लोकांशी चर्चा करूनच पुढील निर्णय घेतला जाईल, असेही सांगितले.