रत्नागिरीत ४०० वर्षांपूर्वीचा महाकाय गोरख वृक्ष, उष्ण कटिबंधीय प्रदेशांत आढळणाऱ्या या वृक्षाचे महत्व काय?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2022 11:56 IST2022-01-13T11:56:13+5:302022-01-13T11:56:47+5:30
पर्यटनदृष्ट्या या 'हेरिटेज ट्री'चा वापर करून येथे उत्तम पर्यटनस्थळ निर्माण करण्याचा त्यांचा मानस आहे.

रत्नागिरीत ४०० वर्षांपूर्वीचा महाकाय गोरख वृक्ष, उष्ण कटिबंधीय प्रदेशांत आढळणाऱ्या या वृक्षाचे महत्व काय?
रत्नागिरी : सुमारे ४०० वर्षांहून अधिक जुना गोरखचिंचेचा महाकाय वृक्ष आजही दिमाखात उभा आहे असे सांगितले तर विश्वास बसणार नाही. पण खरच असा वृक्ष आजही रत्नागिरीत आहे. त्याचे महत्व ओळखून तत्काळ त्याचे जतन आणि संवर्धन करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी घेतला आहे. पर्यटनदृष्ट्या या 'हेरिटेज ट्री'चा वापर करून येथे उत्तम पर्यटनस्थळ निर्माण करण्याचा त्यांचा मानस आहे.
आफ्रिका खंडात, मादागास्कर, ऑस्ट्रेलिया येथे व उष्ण कटिबंधीय प्रदेशांत आढळणाऱ्या या वृक्षाला 'आफ्रिकन बाओबाब' असे म्हटले जाते. रत्नागिरीतील उद्यमनगर येथील महिला रुग्णालयाच्या परिसरामध्ये हा वृक्ष आढळला आहे. जिल्हाधिकारी यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली.
वृक्ष दुर्लक्षित असून त्याच्या बुंध्याभोवती कचरा साठला असून वेलींनी झाडाला गुरफटून टाकले आहे. महिला रुग्णालयाच्या बांधकामामध्ये हे झाड शाबूत राहिले आहे. उद्यमनगर येथील स्थानिकांनी याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांना दिल्यानंतर त्यांनी तत्काळ या झाडाचे जतन करण्याचा निर्णय घेतला आहे.
गोरखचिंच वृक्षाचे महत्त्व
आफ्रिकन बाओबाब वृक्षांची उंची ५० फुटांपर्यंत असते. हा पानगळी वृक्षामध्ये मोडतो. खोडाचा परीघ १०० फुटांपर्यंतही असतो. खोडाचा जाड पापुद्रा राखाडी रंगाचा असतो. फुले मांसल ५ पाकळ्यांची असून, लांब देठाने झाडावर लटकत राहतात. ती रात्री फुलतात. त्यांना मंद सुवास असतो. फुले गळून तेथे बाटलीच्या आकाराची फूटभर लांबीची फळे येतात. ती राखाडी रंगाच्या व कठीण कवचाच्या दुधी भोपळ्यांसारखी दिसतात.
खोडामध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साठते, त्यामुळे पाणी कमी असलेल्या प्रदेशातसुद्धा हे वृक्ष तग धरतात. त्यांचे आयुष्य १००० वर्षे असते. अशा खोडात मादागास्करमध्ये आलेल्या वादळाच्या वेळी काही लोकांनी आश्रय घेतला होता.
महिला रुग्णालयामध्ये आफ्रिकन बाओबाब हे आकर्षक वृक्ष आढळले आहे. त्याचे जतन करून खासगी कंपनीच्या सीआरएस फंडातून हेरिटेज ट्री म्हणून पर्यटन सेल्फी पॉइंट विकसित करण्यात येणार आहे. पंधरा दिवसात त्याचे काम सुरू होईल. - डॉ. बी. एन. पाटील, जिल्हाधिकारी रत्नागिरी