सावधान!, रत्नागिरीसह कोकण किनारपट्टीवर उष्णतेच्या लाटेचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2026 14:37 IST2026-03-10T14:36:59+5:302026-03-10T14:37:27+5:30
तापमानाचा पारा सरासरीपेक्षा ३ ते ५ अंशांनी वाढण्याची शक्यता

सावधान!, रत्नागिरीसह कोकण किनारपट्टीवर उष्णतेच्या लाटेचा इशारा
रत्नागिरी : भारतीय हवामानशास्त्र विभागाने रत्नागिरी आणि संपूर्ण कोकण किनारपट्टीसाठी 'उष्णतेच्या लाटेचा' इशारा दिला आहे. अरबी समुद्रावरून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यांचा वेग मंदावल्याने आणि जमिनीकडून येणाऱ्या उष्ण वाऱ्यांमुळे तापमानाचा पारा सरासरीपेक्षा ३ ते ५ अंशांनी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे ३१ ते ३२ अंशांवरून रत्नागिरीचे तापमान ३७-२८ मिलीमीटर इतके वाढणार असल्याची शक्यता आहे.
सध्या तापमानात मोठ्या प्रमाणावर वाढ होऊ लागली आहे. रत्नागिरीच्या तापमानात उच्चांकी वाढ होऊ लागली असून, तापमान ३८ अंशांपर्यंत जात आहे.
पुढील ३ ते ४ दिवस उष्णतेची लाट तीव्र राहू शकते. रत्नागिरी किनारपट्टीचा भाग असल्याने हवेतील आर्द्रता जास्त असणार आहे. ज्यामुळे प्रत्यक्षातील तापमानापेक्षा उष्णतेची जाणीव (फील्स लाइक) अधिक त्रासदायक होणार आहे. अति उष्णतेमुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होऊन आरोग्यविषयक समस्या वाढणार आहेत. आताच उष्णतेच्या वाढलेल्या प्रमाणामुळे आणि दूषित हवामानामुळे तापसरी, खोकला, पित्ताचे विकार वाढत आहे.
यापुढेही तापमानाचा पारा अधिकाधिक वाढणार असल्याचे हवामान खात्याकडून वर्तविण्यात आले आहे. तापमानात ३ ते ५ अंश सेल्सिअस इतकी वाढ होणार असल्याने त्याचबरोबर आर्द्रतेतही वाढ होणार असल्याने यापुढे नागरिकांना या वातावरणाचा अधिक त्रास होणार आहे.
घामाचे प्रमाणही वाढल्याने उष्माघात, डिहायड्रेशन, त्वचेचे विकार, अति घामामुळे शरीरातील क्षारांचे प्रमाण कमी झाल्याने स्नायूंचे पेटके येणे यांसारख्या त्रासांमध्ये वाढ होणार आहे. जिल्हा प्रशासनाने आरोग्य विभागाला सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. ग्रामीण रुग्णालय आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये 'हीट स्ट्रोक रूम' सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहनही जिल्हा प्रशासनाने केले आहे.
कोणती काळजी घ्यावी?
- तहान लागलेली नसली, तरीही ठराविक अंतराने पाणी पीत राहा.
- लिंबू सरबत, ताक, लस्सी, ओआरएस (ORS) किंवा नारळ पाणी यांसारख्या नैसर्गिक पेयांचा आहारात समावेश करा.
- हलक्या रंगाचे, सैल आणि सुती कपडे वापरा.
- बाहेर जाताना डोके टोपीने किंवा रुमालाने झाकून घ्या.
- घर थंड ठेवा : दिवसा खिडक्यांना पडदे लावा आणि रात्री तापमान कमी झाल्यावर खिडक्या उघड्या ठेवा.
या गोष्टी टाळा
- दुपारी १२ ते ४ या वेळेत शक्यतो घराबाहेर पडणे टाळा.
- उन्हाच्या वेळेत जड कामे किंवा व्यायाम करू नका.
- मद्यपान, चहा, कॉफी आणि जास्त साखर असलेली पेये टाळा. कारण यामुळे शरीरातील पाणी लवकर कमी होते.
- वाहनाचे अंतर्गत तापमान वेगाने वाढते. त्यामुळे पार्क केलेल्या वाहनात मुले किंवा पाळीव प्राण्यांना सोडू नका.
- जनावरांना सावलीत बांधा आणि त्यांना स्वच्छ व थंड पाणी उपलब्ध करून द्या.
- वाहने सावलीत ठेवा.