दापोलीत केवळ २४ तास पुरेल इतकाच ऑक्सिजन साठा : किरीट सोमय्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 19:06 IST2021-05-06T19:04:16+5:302021-05-06T19:06:37+5:30
CoronaVirus Dapoli Ratnagiri : राज्याच्या ग्रामीण भागात वैद्यकीय सुविधांचा अभाव असून राज्याचे आरोग्यमंत्री मात्र जालना व पुणे या भागाकडेच जास्त लक्ष देत असल्याचा आरोप सोमय्या यांनी केला. वस्तुस्थिती पाहून हे मंत्री बोलत नाहीत. आपले अपयश झाकण्यासाठी केंद्राकडे बोट दाखवण्याची सवय त्यांना झाल्याचा आरोप भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी दापोली येथे बोलताना केला.

दापोलीत केवळ २४ तास पुरेल इतकाच ऑक्सिजन साठा : किरीट सोमय्या
दापोली : राज्याच्या ग्रामीण भागात वैद्यकीय सुविधांचा अभाव असून राज्याचे आरोग्यमंत्री मात्र जालना व पुणे या भागाकडेच जास्त लक्ष देत असल्याचा आरोप सोमय्या यांनी केला. वस्तुस्थिती पाहून हे मंत्री बोलत नाहीत. आपले अपयश झाकण्यासाठी केंद्राकडे बोट दाखवण्याची सवय त्यांना झाल्याचा आरोप भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी दापोली येथे बोलताना केला.
दापोली उपजिल्हा रूग्णालयातील कोविड सेंटरची पाहणी माजी खासदार किरीट सोमय्या यांनी गुरूवारी केली. यावेळी रूग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. महेश भागवत यांनी सोमय्या यांना कोविड सेंटरची पूर्ण माहिती दिली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना किरीट सोमय्या म्हणाले की, कोरोनाला अंकुश लावण्यात राज्यसरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे. मुख्यमंत्री केवळ केंद्रसरकारकडे बोट दाखवत आहेत. मात्र राज्याने ज्या उपाययोजना करणे गरजेचे आहे त्या मात्र केल्या जात नाहीत, असा आरोप त्यांनी केला.
कोरोनाच्या लसीबाबत बोलताना सोमय्या म्हणाले की, जगामध्ये केवळ ७ कंपन्यांना कोविडवरची लस उत्पादन करण्याची परवानगी असून, त्यातील २ कंपन्या या भारतामध्ये आहेत. या कंपन्या किती उत्पादन करू शकतात याची पूर्ण कल्पना ही राज्य सरकार म्हणून मुख्यमंत्री व आरोग्य मंत्री यांना आहे. मात्र, आपल्या अपयशाचे खापर केंद्रावर फोडायचे म्हणून केंद्र सरकार लस पुरवत नाही असा खोटा प्रचार केला जात आहे. वस्तूस्थितीत मात्र केंद्राकडून जास्तीत जास्त लसीचा पुरवठा हा महाराष्ट्राला केला जात आहे, असे त्यांनी सांगितले.