जिल्हाधिकारी खुर्ची जप्ती प्रकरण: न्यायालयाच्या कार्यप्रणालीवर बोलणे हा न्यायालयाचा अवमान - उदय सामंत  

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2025 15:04 IST2025-04-07T15:04:06+5:302025-04-07T15:04:53+5:30

दाद मागण्याची सूचना

Collector chair seizure case Talking about the functioning of the court is contempt of court says Uday Samant | जिल्हाधिकारी खुर्ची जप्ती प्रकरण: न्यायालयाच्या कार्यप्रणालीवर बोलणे हा न्यायालयाचा अवमान - उदय सामंत  

जिल्हाधिकारी खुर्ची जप्ती प्रकरण: न्यायालयाच्या कार्यप्रणालीवर बोलणे हा न्यायालयाचा अवमान - उदय सामंत  

रत्नागिरी : न्यायालयाने दिलेल्या निकालाचा आम्ही शंभर टक्के आदर करतो. मात्र, न्यायालयाच्या कार्यप्रणालीवर बाहेर बोलणे, चर्चा करणे हा न्यायालयाचा अवमान आहे, असे स्पष्ट मत राज्याचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरीत मांडले. याबाबत न्यायालयात दाद मागावी, अशी सूचना आपण केल्याचेही त्यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी यांची खुर्ची जप्त करण्याच्या न्यायालयाच्या निर्णयाबाबत रत्नसागर रिसॉर्टचे संचालक उद्योजक प्रताप सावंत यांनी रत्नागिरीत पत्रकार परिषद घेतली हाेती. याबाबत मंत्री सामंत यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, न्यायालयाने दिलेल्या निकालाचा आम्ही शंभर टक्के आदर करताे. परंतु, न्यायालयाने निकाल दिल्यानंतर त्या उद्याेजकाने ज्या पद्धतीने भावना व्यक्त केल्या आहेत, या संस्कृतीला शोभेशा नाहीत. 

खुर्ची जप्त करण्याचा जो निकाल दिला हाेता त्याची काही कार्यप्रणाली न्यायालयात ठरलेली आहे. न्यायालयात ठरलेल्या कार्यप्रणालीवर बाहेर चर्चा करणे हे न्यायालयाचा अवमान आहे. जिल्हाधिकारी यांना सांगितले की, न्यायालयाच्या निर्णयाचा मान-सन्मान राखला पाहिजे. न्यायालयाने जे निर्देश दिले त्याचे पालन झाले पाहिजे. या संदर्भात प्रांतांनी जी प्रक्रिया करायची हाेती ती केलेली आहे, असे त्यांनी सांगितले.

आम्हाला काेणाच्या सल्ल्याची गरज नाही

ही जागा काेणाकडे आहे, त्यापेक्षा निकाल लागल्यावर खासगी कंपनीने त्याच्यावर टीकाटिप्पणी करणे याेग्य नाही. आम्हाला माहिती आहे त्या जागेवर काय करायचे आहे, पर्यटन कसे विकसित करायचे, यासाठी आम्हाला काेणाच्याही सल्ल्याची आवश्यकता नाही. मात्र, बाहेरील व्यक्ती रत्नागिरीत येऊन जिल्हाधिकारी यांची खुर्ची जप्त केल्याचे समाधान व्यक्त करते हे खेदजनक आहे, असेही मंत्री सामंत म्हणाले.

महिनाभरात बसस्थानकाचे लाेकार्पण

येत्या महिनाभरात रत्नागिरीतील बसस्थानकाचे लाेकार्पण करण्यात येईल. संपूर्ण महाराष्ट्रातील अत्याधुनिक आणि एक हायटेक बसस्थानक रत्नागिरीमध्ये बघायला मिळेल.

Web Title: Collector chair seizure case Talking about the functioning of the court is contempt of court says Uday Samant