रत्नागिरी : राजापूर तालुक्यात शुक्रवारी रात्री काेसळलेल्या मुसळधार पावसामुळे नद्यांना पूर आला आहे. या पुराच्या पाण्याचा तालुक्यातील अनेक गावांना फटका बसला असून, तालुक्यातील प्रसिद्ध आडिवरे येथील श्रीदेवी महाकाली मंदिराच्या आवारात पुराचे पाणी शिरले हाेते. तब्बल ३७ वर्षानंतर मंदिराच्या आवारात पुराचे पाणी शिरले हाेते.राजापूर तालुक्यात शुक्रवारी सायंकाळपासून पावसाने काेसळण्यास सुरुवात केली हाेती. सायंकाळी ७ वाजल्यानंतर पावसाचा जाेर वाढला हाेता. ढगफुटी सदृश्य काेसळलेल्या पावसामुळे अनेक भागातील नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली हाेती. आडिवरे येथील महाकाली मंदिराच्या आवारात आणि सभामंडपात पहिल्यांदाच पावसाचे पाणी शिरले हाेते. स्थानिक रहिवाशांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या ३७ वर्षांत इतक्या मोठ्या प्रमाणावर पाणी मंदिरात कधीही शिरले नसल्याचे सांगितले. पावसामुळे मंदिराच्या परिसरात सर्वत्र पाणीच पाणी झाले होते. हे पाणी मंदिराच्या सभामंडपापर्यंत पोहोचले हाेते.त्याचबराेबर वाडापेठ येथील रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या टपऱ्या पुराच्या पाण्यात वाहून गेल्या. काहींच्या गाड्याही वाहून गेल्या असून, दुकानांमध्ये सुमारे अडीच फुटापर्यंत पाणी शिरले हाेते. शनिवारी सकाळी पुराचे पाणी ओसरताच ग्रामस्थांनी दुकानांची साफसफाई केली.
Ratnagiri: राजापुरात ढगफुटीसदृश्य पाऊस, आडिवरे येथील महाकाली मंदिरात पुराचे पाणी
By अरुण आडिवरेकर | Updated: June 14, 2025 13:09 IST