रत्नागिरीत पांडुरंगाच्या नगर प्रदक्षिणेमध्ये घडले हिंदू- मुस्लीम ऐक्याचे दर्शन
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2022 17:27 IST2022-11-08T17:26:56+5:302022-11-08T17:27:27+5:30
अनेक वर्षे सुरू असलेली ही परंपरा आजही जपली जात आहे

रत्नागिरीत पांडुरंगाच्या नगर प्रदक्षिणेमध्ये घडले हिंदू- मुस्लीम ऐक्याचे दर्शन
रत्नागिरी : प्रतिपंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रत्नागिरी शहरातील विठ्ठल मंदिरात कार्तिक एकादशीपासून उत्सवाला सुरुवात झाली आहे. वैकुंठ चतुर्दशीला ५ नोव्हेंबर रोजी देव विठोबाची रथातून रत्नागिरी नगराची प्रदक्षिणा पार पडली. विठोबाचा रथ धनजीनाका येथे आल्यावर येथील दर्ग्यामध्ये हिंदू बांधवांनी जाऊन नमस्कार केला. तर विठ्ठल मंदिर देवस्थानकडून नारळ पेढे ठेवले. तर दर्गा कमिटीकडून विठोबाला रथामध्ये श्रीफळ पेढे देण्यात आले.
श्रीविठ्ठलच्या नगर प्रदक्षिणेत हिंदू-मुस्लीम ऐक्याचे दर्शन घडत आले आहे. अनेक वर्षे सुरू असलेली ही परंपरा आजही जपली जात असल्याचे विठ्ठल मंदिराचे ट्रस्टी व माजी नगराध्यक्ष अशोक मयेकर यांनी सांगितले. त्यानंतर दर्ग्याजवळच कापूर आरती करण्यात आली. भक्तांनी याठिकाणी लोटांगण घातले. त्यानंतर हा रथ नगर प्रदक्षिणा करायला पुढे सरकला. संपूर्ण शहराला प्रदक्षिणा करून हा रथ मग बारा वाड्यांचे ग्रामदैवत भैरी मंदिरात दाखल झाला. तिथे हरिहरेश्वराची भेट झाल्यानंतर हा रथ व पालखी विठ्ठल मंदिरात दाखल झाली.