चिपळूण : वाशिष्ठी नदीपात्रात पोहायला गेलेल्या दहावीतील विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू झाला आहे. ही घटना आज, बुधवारी सायंकाळच्या सुमारास घडली. गोवळकोट मोहल्ला येथील तलहा मन्सूर घारे (वय-१५, गोवळकोट मोहल्ला, चिपळूण) असे मृत विद्यार्थ्यांचे नाव आहे. तलहा घारे याने नुकतीच दहावीची परीक्षा दिली. मंगळवारी शेवटचा पेपर झाल्यानंतर त्या आनंदात बुधवारी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास चौजण गोवळकोट येथील नगर परिषदेच्या जॅकवेलनजीक पोहण्यासाठी गेले होते. मात्र त्याचवेळी वाशिष्ठी नदीला मोठ्या प्रमाणात पाणी आले होते. नदीच्या प्रवाहात तलहा घारे व त्याचा छोटा भाऊ असे दोघेजण वाहून गेले. मात्र छोटा भाऊ वाचला आणि तलहा घारे काही क्षणात दिसेनासा झाला.
यावेळी आरडाओरडा होताच घटनास्थळी अनेकांनी धाव घेतली. तलहा घारे याचा स्थानिक बोटचालकांच्या मदतीने शोध घेण्याचा प्रयत्न केला असता तो अर्ध्या तासाने तो मृतावस्थेत सापडला. या घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर मृतदेह बाहेर काढण्यात आला. मृतदेह शवविच्छेदनासाठी कामथे उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिस अधिक तपास करीत आहेत.