रत्नागिरी जिल्ह्यात ६६६ विद्यार्थ्यांचे अर्ज पडताळणीविना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2018 16:04 IST2018-05-09T16:04:58+5:302018-05-09T16:04:58+5:30
रत्नागिरी जिल्ह्यातील ज्या माध्यमिक शाळांनी अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांसाठी प्री-मॅट्रिक शिष्यवृत्तीचे प्रस्ताव आॅनलाईन भरलेले आहेत, त्याच्या पडताळणीची मुदत ३० नोव्हेंबर २०१७ रोजी संपलेली आहे. परंतु, रत्नागिरी जिल्ह्यातील नूतनीकरणाच्या एकूण ६६६ विद्यार्थ्यांच्या अर्जाची पडताळणी विहीत मुदतीत झालेली नसल्याची माहिती पुढे आली आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात ६६६ विद्यार्थ्यांचे अर्ज पडताळणीविना
हातखंबा : जिल्ह्यातील ज्या माध्यमिक शाळांनी अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांसाठी प्री-मॅट्रिक शिष्यवृत्तीचे प्रस्ताव आॅनलाईन भरलेले आहेत, त्याच्या पडताळणीची मुदत ३० नोव्हेंबर २०१७ रोजी संपलेली आहे. परंतु, रत्नागिरी जिल्ह्यातील नूतनीकरणाच्या एकूण ६६६ विद्यार्थ्यांच्या अर्जाची पडताळणी विहीत मुदतीत झालेली नसल्याची माहिती पुढे आली आहे.
केंद्र शासनाने ज्या नूतनीकरण विद्यार्थ्यांच्या अर्जांची पडताळणी शाळा / संस्था तसेच जिल्हास्तरावर झालेली नव्हती, अशा विद्यार्थ्यांसाठी केंद्र शासनाने १६ मे २०१८ पर्यंत पडताळणीची प्रक्रिया पूर्ण करण्याबाबत कळवलेले आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील ६६६ नूतनीकरण विद्यार्थ्यांची पडताळणी होऊ न शकल्याने हे विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहिले होते. अशा विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळावी, यासाठी पडताळणीची संधी उपलब्ध करून दिलेली आहे.
शाळा / संस्था स्तरावर नूतनीकरण विद्यार्थ्यांचे आॅनलाईन भरलेल्या अर्जांची पडताळणी विहीत मुदतीत करण्याची संपूर्ण जबाबदारी संबंधीत शाळांच्या मुख्याध्यापकांची आहे. शाळा व संस्था स्तरावर शिल्लक असलेल्या विद्यार्थ्यांची पडताळणी कोणत्याही परिस्थितीत ११ मे, २०१८ पर्यंत पूर्ण करण्याची आहे.
ही पडताळणी मुदतीत न केल्यास आणि विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहिल्यास याकरिता मुख्याध्यापकाला जबाबदार धरण्यात येईल.