आपत्ती व्यवस्थापनची पेणमध्ये कसोटी
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2021 00:27 IST2021-05-08T00:27:35+5:302021-05-08T00:27:55+5:30
चार धरणांतील पाण्याचा विसर्ग निर्माण करतो पूरपरिस्थिती

आपत्ती व्यवस्थापनची पेणमध्ये कसोटी
लोकमत न्यूज नेटवर्क
पेण : मान्सूनचे आगमन वेळेवरच होणार असल्याने रायगड जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा जागी झाली आहे. रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांनी शुक्रवारी यासंदर्भात व्हिडिओकॉन्फरन्सद्वारे बैठक घेऊन अधिकारी वर्गाशी आपत्कालीन परिस्थितीत उद्भवणार हे गृहीत धरून तातडीने राबविण्यात येणाऱ्या उपाययोजना बाबतीत आढावा घेतला.
पेणमध्ये हेटवणे आंबेघर शहापाडा व बाळगंगा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मान्सून हंगामात पाण्याचा होणारा विसर्ग यामुळे भोगावती, बाळगंगा, नद्यांच्या पातळीत होणारी धोकादायक वाढ यामुळे पेण ग्रामीण भागातील पूरपरिस्थितीसाठी हाताळणे आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेच्या आवाक्याबाहेर असते. यामुळे पेणच्या आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेने प्रभावी उपाययोजना राबविण्यात याव्यात, अशी नागरिकांची मागणी आहे. यावर्षी मान्सून हंगामात हवामानशास्त्र विभागाने सरासरीच्या ९८ टक्के पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. यानुसार जून महिन्यात १०६ टक्के, जुलैमध्ये ९९ टक्के, ऑगस्ट महिन्यांत, ९७ टक्के व सप्टेंबर महिन्यात ११६ टक्के पाऊस पडेल असा अंदाज वर्तविण्यात आला आहे, तर दुसरीकडे समुद्राला १८ दिवस हायटाइड उधाण भरतीच्या ४.७८ मीटर पाणी पातळीत वाढ होईल. नद्यांच्या धोकादायक पूररेषेत भोगावती नदीकाठी पेण शहर, अंतोरे, नवघर, पाटणोली, सापोलीबेडी, कणे, भोगावती नदीचा प्रवाहासमोर कणे गाव येत असल्याने या खाडीकिनारचा संरक्षक बंधारा वेगवान प्रवाहाच्या धडकेने फुटतो आणि अखंड गाव पुराने वेढले जाते. या नदीपात्रात आंबेघर व हेटवणे धरणाच्या पाण्याचा विसर्ग व आपत्कालीन परिस्थितीत धरणाचे उघडले जाणारे दरवाजे अशा परिस्थितीत या ठिकाणी आपत्कालीन व्यवस्थापन यंत्रणेने आताच संभाव्य उपाययोजना केल्या पाहिजेत. दुसरीकडे दक्षिण बाजूकडील शहापाडा धरणातील पाणीसाठा लवकर जुलैच्या पहिल्या पंधरवड्यात ओव्हरफ्लो होऊन ते पाणी वाशी नाका मार्गे कणे खाडीत येत असल्याने परिस्थिती भयानक बनते. रहदारीचे मार्ग बंद होतात. यात आणखी भर पडते ती पावसाळी येणाऱ्या उधाण भरतीच्या पाणीपातळीची भरतीची पाणीपातळी नद्यांच्या प्रवाहाला अडविणे आणि पुराच्या पाण्याची पातळी होत्याच नव्हते करते. आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेसमोर ही मोठी जबाबदारी आहे.
बाळगंगा नदीकिनारी उपाययोजना आवश्यक
बाळगंगा नदीकिनारी खरोशी दूरशेत, जिते तर पातालगंगा नदी प्रवाह दुष्मी, खारपाडा, जिते, यावे, जोहे, तांबडशेत, दादर या गावांना वेणीत जात अरबी समुद्रात विसावते. धरणे, नद्यांच्या पट्ट्यातील येणार पाणी आणि समुद्राला येणारी उधाण भरती यांचा ताळमेळ योगायोग जुळून येत असल्याने पेण शहर व ग्रामीण भागातील नदी व खाडी किनारी भागात मोठ्या प्रमाणात उपाययोजना राबविण्यात याव्यात अशी अपेक्षा आहे.