"...तोपर्यंत भरतशेठला कोणीही हरवू शकत नाही"; मुलाच्या विजयानंतर भरत गोगावलेंनी विरोधकांना सुनावले
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2026 13:04 IST2026-02-09T12:49:20+5:302026-02-09T13:04:31+5:30
रायगडमध्ये मंत्री भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले विजयी झाले आहेत.

"...तोपर्यंत भरतशेठला कोणीही हरवू शकत नाही"; मुलाच्या विजयानंतर भरत गोगावलेंनी विरोधकांना सुनावले
Raigad ZP Election: रायगड जिल्हा परिषदेच्या रणधुमाळीचा निकाल अखेर हाती आला असून, राजकीय समीकरणे आणि वैयक्तिक प्रतिष्ठा पणाला लागलेल्या या निवडणुकीत महायुतीने मुसंडी मारली आहे. महाड आणि अलिबाग या मतदारसंघांकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. नडगाव बिरवाडी या प्रतिष्ठेच्या गटातून राज्याचे मंत्री भरत गोगावले यांचे सुपुत्र विकास गोगावले यांनी दणदणीत विजय मिळवला असून, अलिबागमध्ये आमदार महेंद्र दळवींच्या पत्नी मानसी दळवी यांनी विजयाचा चौकार मारला आहे.
विकास गोगावलेंचा 'वनवास' संपला; मतदारांचा कौल पदरात
नडगाव तर्फे बिरवाडी या गटातून विकास गोगावले यांचा विजय अनेक अर्थांनी महत्त्वाचा मानला जात आहे. काही महिन्यांपूर्वी महाड नगर परिषद निवडणुकीच्या वेळी झालेल्या राडा प्रकरणामुळे विकास गोगावले कायदेशीर कचाट्यात सापडले होते. या प्रकरणात त्यांना काही काळ फरार घोषित करण्यात आले होते, तसेच सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर त्यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या कडक ताशेऱ्यांनंतर पोलिसांसमोर हजर व्हावे लागले होते. विरोधकांनी या प्रकरणाचा प्रचारात मोठा मुद्दा केला होता. मात्र, विकास गोगावले यांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळवत टीकाकारांना चोख प्रत्युत्तर दिले आहे.
या निकालानंतर प्रतिक्रिया देताना भरत गोगावले यांनी हा जनतेचा विजय असल्याचे सांगत केलेल्या कामाचा मोबदला मिळाल्याचे सांगितले. "हा कार्यकर्त्यांचा विजय आहे. जनतेने दिलेला कौल आम्ही स्वीकारतोय. जे काम करतोय त्यामुळे जनतेने स्विकारले आहे. मी नेहमीच सांगत आलोय जो पर्यंत भरतशेठची नियत आणि नीतीमत्ता चांगली आहे तोपर्यंत भरतशेठला कुणीही हरवू शकत नाही, हा माझा दावा होता. गोरगरिब जरी आला तरी तो आपला मतदार असतो, सहकार्य करणारा असतो. त्याचा अवमान करणे आपल्याला शक्य नाही. जरी काही झालं तरी आम्ही त्याच्या पाठीमागे असतो. त्याचा मोबदला जनतेने मला दिला आहे," असं भरत गोगावले म्हणाले.
मानसी दळवींचा 'चौकार' आणि अध्यक्षपदाची चर्चा
अलिबागच्या थळ जिल्हा परिषद मतदारसंघातून शिवसेना आमदार महेंद्र दळवी यांच्या पत्नी मानसी दळवी यांनी ६,००० मतांच्या फरकाने प्रतिस्पर्ध्याला धूळ चारली. मानसी दळवी यांचा हा सलग चौथा विजय असल्याने त्यांचा जिल्हा परिषदेतील अनुभव दांडगा आहे. या विजयानंतर आता रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी त्यांचे नाव आघाडीवर असून, जिल्ह्याच्या पहिल्या नागरिक म्हणून त्यांच्या गळ्यात माळ पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
अमित नाईक विजयी
जिल्ह्यात केवळ शिवसेनाच नव्हे, तर राष्ट्रवादीनेही (अजित पवार गट) आपले अस्तित्व सिद्ध केले आहे. राष्ट्रवादीने ३ जागांवर विजय मिळवला असून, यामध्ये अमित नाईक यांच्यासह दोन उमेदवारांनी बाजी मारली आहे.