"तू इथं कसा राहतो तेच बघतो, काही झालं तरी...", महाडच्या 'पीआय'चं थेट 'डीआयजीं'ना पत्र, पोलीस दलात खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2026 14:42 IST2026-02-22T14:41:30+5:302026-02-22T14:42:01+5:30
महाड शहर पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारल्यानंतर काही दिवसांतच त्यांना राजकीय आणि अंतर्गत षड्यंत्राचा सामना करावा लागला.

"तू इथं कसा राहतो तेच बघतो, काही झालं तरी...", महाडच्या 'पीआय'चं थेट 'डीआयजीं'ना पत्र, पोलीस दलात खळबळ
ज्या खाकी वर्दीने समाजाला न्याय मिळवून द्यायचा, त्याच वर्दीत लपलेल्या जातीय मानसिकतेने एका कर्तव्यदक्ष पोलीस अधिकाऱ्याचा जगण्याचा थरकाप उडवला आहे. "तू खालच्या जातीचा आहेस, तू इथे कसा टिकतो तेच बघतो," अशा शब्दांत होणारा अपमान आणि वरिष्ठांकडून होणारा मानसिक छळ सहन न झाल्याने महाड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रमेश तडवी यांनी थेट पोलीस महासंचालकांना पत्र धाडले आहे. या पत्रात त्यांनी दोन पोलीस अधीक्षकांसह सात बड्या अधिकाऱ्यांच्या नावांचा उल्लेख करत, कुटुंबासह आयुष्य संपवण्याचा इशारा दिला आहे.
'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!
कोर्टातून न्याय मिळवला, पण छळ थांबला नाही!
रमेश तडवी यांची जानेवारी २०२४ मध्ये ठाणे ग्रामीणमधून रायगडला बदली झाली होती. महाड शहर पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारल्यानंतर काही दिवसांतच त्यांना राजकीय आणि अंतर्गत षड्यंत्राचा सामना करावा लागला. खोटा कसूरी अहवाल सादर करून त्यांची बदली नियंत्रण कक्षात करण्यात आली होती. या अन्यायाविरोधात तडवी यांनी 'मॅट' आणि उच्च न्यायालयात लढा दिला. न्यायालयाने त्यांच्या बाजूने निकाल देऊन त्यांना पुन्हा महाडच्या प्रभारीपदी बसवण्याचे आदेश दिले. १० सप्टेंबर २०२५ रोजी ते रुजू झाले, पण तिथूनच त्यांच्या छळाचा दुसरा अंक सुरू झाला.
७ बड्या अधिकाऱ्यांवर थेट आरोप
तडवी यांनी आपल्या पत्रात तत्कालीन एसपी सोमनाथ घार्गे, सध्याच्या एसपी आंचल दलाल, अपर पोलीस अधीक्षक अभिजित शिवथरे, डीवायएसपी शंकर काळे यांच्यासह सात जणांना आपल्या मृत्यूला जबाबदार धरले आहे. "मी आदिवासी भिल्ल समाजाचा असल्याने मला वारंवार जातीवरून हिणवले जाते. डीवायएसपी शंकर काळे आणि सपोनि जीवन माने हे बाहेरच्या लोकांसमोर माझा अपमान करतात," असा गंभीर आरोप तडवी यांनी केला आहे.
बेकायदेशीर अटकेसाठी दबाव?
या वादामागे केवळ जातीयवाद नसून राजकीय दबाव असल्याचेही समोर येत आहे. महाड नगरपालिकेच्या निवडणुकीदरम्यान झालेल्या वादात आमदार भरत गोगावले यांच्या मुलाचे नाव असलेल्या गुन्ह्यात सहकार्य करण्यासाठी वरिष्ठांनी दबाव आणला होता, असा दावा तडवी यांनी केला आहे. तीन निष्पाप व्यक्तींना बेकायदेशीरपणे अटक करण्यास नकार दिल्यानेच आपल्याला टार्गेट केले जात असल्याचे त्यांनी पत्रात नमूद केले आहे.
कुटुंब तणावाखाली, शेवटचा पर्याय मृत्यू?
"वारंवार होणारा अपमान आणि बदनामीमुळे माझे कुटुंब प्रचंड मानसिक दडपणाखाली आहे. जर आम्हाला काही झाले तर त्याला हे सात अधिकारीच जबाबदार असतील," असे काळजाचा थरकाप उडवणारे विधान तडवी यांनी पत्रात केले आहे. राज्याच्या पोलीस दलात एका पोलीस निरीक्षकाला आपल्याच वरिष्ठांविरुद्ध अशी भूमिका घ्यावी लागल्याने गृहविभागाच्या कार्यक्षमतेवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.