पंचवीस किल्ले दत्तक द्या, संभाजीराजेंची सरकारकडे मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2025 19:37 IST2025-06-07T19:37:15+5:302025-06-07T19:37:31+5:30
मुंबईत बसून टीकाटिप्पणी नको; एक पैसाही नको, तो आम्ही उभा करू..

पंचवीस किल्ले दत्तक द्या, संभाजीराजेंची सरकारकडे मागणी
अलिबाग-कोल्हापूर : सरकारला हात जोडून विनंती करतो, राज्यातील २५ किल्ले दत्तक द्या. हा शिवाजी महाराजांचा शिवभक्त वारसदार आपले वेगळेपण दाखवून देईल, असा विश्वास संभाजीराजे छत्रपती यांनी व्यक्त केला. किल्ले रायगडावर अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महाेत्सव समितीच्या वतीने आयोजित शिवराज्याभिषेक सोहळ्यावेळी ते बोलत होते. यासाठी एक पैसाही देऊ नका. ते आम्ही उभे करू. अशक्य ते शक्य करण्याची धमक या संभाजी छत्रपतीमध्ये आहे, असाही दावा त्यांनी केला.
ते म्हणाले, राज्याभिषेक सोहळा हा राष्ट्रीय सण म्हणून साजरा व्हावा. सध्याच्या स्थितीत दहशतवाद वाढू लागला आहे, महिलांवर अन्याय होऊ लागले आहेत, जातीयवाद वाढत आहे. अशा परिस्थितीत अभ्यासक्रमामध्ये शिवरायांच्या गाथेचा समावेश झाला पाहिजे. या रायगडावर महाराजांना शोभणाऱ्याच गोष्टी राहतील. जिल्हा प्रशासन आणि शिवभक्तांचे आभार मानत असताना संभाजीराजे यांनी आपण पुढच्यावर्षी तुमच्यासोबत तंबूत राहणार असल्याचे सांगितले.
राजसदरेचे पुरावे उपलब्ध..
छत्रपती शिवाजी महाराज राजसदरेच्या पाठीमागील बाजूस राहत होते. याचे पुरावे मिळाले आहेत. त्यामुळे पुरातत्व खात्याने आता आम्हांला राजसदरेचे राजवैभव पुन्हा उभारण्यासाठी परवानगी द्यावी.
शिवरायांविषयी अनुदगार, निर्णय घ्या
कोणी भाषणातून, कोणी नाटकातून शिवाजी महाराजांविषयी अनुद्गार काढतो. परंतु, हे बंद झाले पाहिजे. यांना शिस्त नको का लावायला. कोणी काही बोलले तर एक पक्ष त्याची बाजू घेतो. म्हणून दुसरा दुसरी बाजू घेतो, हे चालणार नाही. शासनाने एक समिती करावी. स्मारक ग्रंथ करावा जाे सर्वांसाठी बंधनकारक राहील, असे संभाजीराजे यांनी सांगितले.
मुंबईत बसून टीकाटिप्पणी नको
काहीजण मुंबईत मला टार्गेट करीत आहेत. माझ्यावर टीकाटिप्पणी करीत आहेत. त्यांनी रायगडावर येऊन पाहावं. माझ्यासोबत दोन दिवस राहून काम बघावं. हे काही पुलाचे आणि डांबरी रस्त्याचे काम नाही. हे किल्ले संवर्धनाचे काम आहे, असा टोलाही संभाजीराजे यांनी लगावला.