भारतीय लष्करात मोठी भरती : ‘कोरोना’च्या मंदीत महिलांना
केंद्र शासनाच्या नोकरीची संधी
--
बारामती :
कोरोनामुळे देशात निर्माण झालेल्या मंदीच्या काळात महिलांना कें द्र शासनाच्या नोकरीची संधी मिळाली आहे. भारतीय लष्करातील सोल्जर जनरल ड्यूटी म्हणजेच वूमन मिलिटरी पोलीस या पदांची भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. महिलांसाठी गेल्या काही वर्षांतील ही तिसरी संधी आहे.
या पदासाठी शंभर जागा असून त्यासाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन आवश्यक आहे. हे ऑनलाईन रजिस्ट्रेशन ६ जून ते २० जुलै २०२१ पर्यंत सुरू राहणार आहे. त्यानंतर महिला उमेदवारांना त्यांच्या इमेलवर अॅडमिट कार्ड पाठवले जाणार आहे. त्या ॲडमिट कार्डवर भरतीचे ठिकाण, दिनांक, वेळ इत्यादी सर्व गोष्टी नमूद असणार आहेत. ही रॅली महाराष्ट्रातील उमेदवारांना पुण्यामध्ये असणार आहे. यासाठीची वयाची पात्रता ही १७.५ ते २१ वर्ष या दरम्यान आहे म्हणजेच महिला उमेदवाराचा जन्म १ ऑक्टोबर २००० ते एप्रिल २००४ या दरम्यान असणे आवश्यक आहे. तसेच उंची १५२ सेंटीमीटर, वजन उंची आणि वयाच्या प्रमाणात असावे. यासाठीचे शिक्षण ४५ टक्के गुणांसह दहावी उत्तीर्ण असावे. शारीरिक पात्रता मध्ये काही घटकांना सवलत देण्यात आली आहे.
यामध्ये आजी-माजी सैनिकांच्या मुली, शहीद सैनिकांच्या मुली यांना उंची दोन सेंटीमीटर, वजनात दोन किलो सवलत देण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये सुरुवातीला शारीरिक क्षमता चाचणी घेतली जाते. या शारीरिक क्षमता चाचणी १.६ किलो मीटर म्हणजे सोळाशे मीटर धावणे हा महत्त्वाचा प्रकार आहे त्यासाठी गुणांकन आहे .त्याचबरोबर लांब उडी ,उंच उडी या प्रकारांचा समावेश आहे .पण त्यांना गुण दिले जाणार नाहीत. शारीरिक क्षमता चाचणी झाल्यानंतर महिला उमेदवारांची वैद्यकीय चाचणी घेतली जाणार आहे. या वैद्यकीय चाचणीत शारीरिक दृष्ट्या व मानसिक दृष्ट्या फिट असणे आवश्यक आहे .तसेच प्रेग्नेंसी व टॅटू ला प्रतिबंध केला आहे. परमनंट टॅटू हाताच्या दर्शनी भागावर असेल तर उमेदवारांना भरती प्रक्रियेतून बाहेर जावे लागेल. वैद्यकीय चाचणी झाल्यानंतर उमेदवारांची लेखी परीक्षा घेतली जाईल. लेखी परीक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाची आहे. यासाठी निगेटिव्ह मार्किंग आहे. या लेखी परीक्षेतून आजी-माजी सैनिकांच्या मुली विधवा व एनसीसी धारक महिला उमेदवार यांना काही गुण दिले जातात. अशा पद्धतीने मैदानी चाचणी व लेखी परीक्षेतून उमेदवारांची निवड केली जाणार आहे. पण उमेदवारांची संख्या जास्त आल्यास दहावीच्या गुणांच्या आधारे उमेदवारांची संख्या मर्यादित केली जाईल.
--
कोट
महिलांना गेल्या काही वर्षांपासून नव्यानेच लष्करात दाखल होण्याची संधी मिळत आहे. ही तिसरी भरती आहे. त्यासाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन केल्यानंतर अॅडमिट कार्ड मिळते. हे कार्ड घेऊनच भरतीला जावे. ही भरती खुली नसते ही बाब लक्षात घ्यावी.
उमेश रुपनवर
सांचलक, सह्याद्री करीअर अॅकॅडमी
————————————————
————————————