कृषी उद्योग प्रक्रियेत महिलांची आघाडी; केंद्राच्या योजनेत तब्बल ५७ टक्के उद्योग महिला संचलित
By नितीन चौधरी | Updated: February 19, 2025 17:29 IST2025-02-19T17:29:06+5:302025-02-19T17:29:26+5:30
महिला उद्योजिकांच्या प्रकल्पांची संख्या सुमारे १२ हजार आहे. हे प्रमाण तब्बल ५७ टक्के इतके आहे.

कृषी उद्योग प्रक्रियेत महिलांची आघाडी; केंद्राच्या योजनेत तब्बल ५७ टक्के उद्योग महिला संचलित
पुणे : कृषी विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या पंतप्रधान सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजनेत आतापर्यंत २१०० कोटी रुपयांचे प्रकल्प कार्यान्वित झाले आहेत. या योजनेत आतापर्यंत २१ हजार १४९ प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे. यात महिला उद्योजिकांच्या प्रकल्पांची संख्या सुमारे १२ हजार आहे. हे प्रमाण तब्बल ५७ टक्के इतके आहे. कृषी विभागाने महिलांच्या सुमारे साडेआठ हजार प्रकल्पांना आतापर्यंत १५५ कोटी रुपयांचे अनुदान वितरित केले आहे. राज्यात सर्वाधिक १ हजार ८८२ उद्योग संभाजीनगर जिल्ह्यात सुरू करण्यात आले आहेत.
केंद्र सरकार कृषी आधारित प्रक्रिया उद्योगाला चालना देण्यासाठी पंतप्रधान सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजनेतून अर्थसहाय देत असते. यात प्रकल्प खर्चाच्या ३५ टक्के किंवा दहा लाखांपर्यंत अनुदान दिले जाते. राज्यात २०२१ पासून ही योजना राबविण्यात येते. त्याचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज करावा लागतो. प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी उद्योजकांना मार्गदर्शन करण्यासाठी स्वतंत्र व्यक्तीची नेमणूक करण्यात आली आहे.
याबाबत कृषी संचालक विनयकुमार आवटे म्हणाले, आतापर्यंत २१ हजार १४९ प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे. यात महिलांचे ११ हजार ९९५ प्रकल्प असून एकूण प्रकल्प संख्येच्या हे प्रमाण तब्बल ५७ टक्के इतके आहे. अनुदान मंजूर केलेल्या १५ हजार ११२ प्रकल्पांना आतापर्यंत ३८८ कोटी रुपयांचे अनुदान वितरित करण्यात आले आहे. यातील ८ हजार ४७६ प्रकल्प महिला संचलित असून त्यांना आतापर्यंत १५५ कोटी रुपये अनुदानापोटी देण्यात आले आहेत. तर ३ हजार ५१९ प्रकल्प मान्यतेच्या प्रक्रियेत आहेत. कृषी प्रक्रिया उद्योगात महिलांची संख्या वाढत असल्याचे यावरून स्पष्ट होत आहे. एकल महिलांसह महिला गटांनीही मोठ्या प्रमाणावर सहभाग घेतला आहे.
राज्यात २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी या योजनेतून ४२६ कोटी रुपयांच्या अनुदान वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले होते. जानेवारीअखेर २५६ कोटींचे अनुदान वितरित करण्यात आले.
जिल्हानिहाय अर्जांची संख्या
अहिल्यानगर १३१४
अकोला ३८९
अमरावती ७४९
संभाजीनगर १८८२
बीड १२४
भंडारा ३३८
बुलढाणा ९०२
चंद्रपूर ६६७
धुळे ५१६
गडचिरोली २६९
गोंदिया ६२२
हिंगोली १७०
जळगाव ९३०
जालना ५३८
कोल्हापूर ८६७
लातूर ३४६
मुंबई ५
मुंबई उपनगर ४३
नागपूर ६८३
नांदेड ३०२
नंदूरबार ४९५
नाशिक ११४१
धाराशिव ४०९
पालघर २८२
परभणी २७३
पुणे १०८३
रायगड २४१
सांगली ११८४
सातारा ९१२
सिंधुदुर्ग ४६२
सोलापूर ९०८
ठाणे ३१८
वर्धा ७७४
वाशिम ४११
यवतमाळ ७२८