अयोध्या दौरा का रद्द केला? राज ठाकरेंनी भावना व्यक्त करत केला मोठा गौप्यस्फोट!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2022 14:43 IST2022-05-22T12:28:05+5:302022-05-22T14:43:05+5:30
Raj Thackeray in Pune : मी हट्टाने तेथे जायचे ठरवले असते, तर महाराष्ट्रातील अनेक हिंदू बांधव तेथे आले असते आणि जर तेथे काही बरे वाईट झाले असते तर आमची पोरं नाहक गेली असती.

अयोध्या दौरा का रद्द केला? राज ठाकरेंनी भावना व्यक्त करत केला मोठा गौप्यस्फोट!
पुणे- राज ठाकरे यांनी आपला अयोध्या दौरा रद्द केल्यानंतर, राज्यांतील अनेक नेत्यांनी, त्यांच्या या निर्णयाची खिल्ली उडवली हेती. या सर्व नेत्यांना आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सविस्तर आणि थेट उत्तर दिले आहे. एवढेच नाही, तर त्यांनी या दौऱ्यासंदर्भातील आपल्या भावना व्यक्त करत मोठा गौप्य स्फोटही केला. ते पुण्यातील गणेश कला क्रीडा मंचच्या सभागृहात बोलत होते.
राज ठाकरे म्हणाले, "मी एक ट्विट केले होते, अयोध्या दौरा तुर्तास रद्द. यानंतर, अनेकांना वाईट वाटले, अनेकांना आनंद झाला आणि अनेक जण काही कुत्सितपणे बोलायला लागले. मी मुद्दामच दोन दिवसांचा बफर वेळ दिला होता. काय बोलायचे ते बोलून घ्या. मंग मी सांगेन, असा विचार केला होता. मी अयोद्धेला जाणार असल्याची तारीख जाही केली. मग प्रकरण सुरू झाले, की राज ठाकरेंना आयोध्येत येऊ देणार नाही. मी संर्व पाहत होतो. मला दिल्ली, उत्तर प्रदेश आणि मुंबईतूनही माहिती मिळत होती. नंतर माझ्या लक्षात आले, की हा सापळा आहे. आपण या सापळ्यात अडकूण चालणार नाही. कारण जी रसद पुरवली गेली, त्याची सुरुवात राज्यातून झाली. माझी वारी अनेकांना खुपली, त्या सर्वांनी मिळून हा संपूर्ण डाव रचला होता," असा गौप्यस्फोट राज ठाकरे यांनी केला.
"कारसेवा झाली तेव्हा मुलायम सिंग सरकाने आपल्या अनेक कारसेवकांना ठार मारण्यात आले होते. त्या शरयू नदीत प्रेतं तरंगताना मी दूरदर्शनवर पाहिली होती. जीथे कारसेवकांना मारले गेले. त्या ठिकाणाचे दर्शन मला घ्यायचे होते. पण असो, राजकारणात अनेकांना भावना संमजत नसतात," अशा शब्दात राज ठाकरे यांनी अयोध्या दौऱ्या मागची आपली भावनाही यावेळी बोलून दाखवली.
राज्यातली माझी ही ताकद मला नाहक लावायची नव्हती -
मी हट्टाने तेथे जायचे ठरवले असते, तर महाराष्ट्रातील अनेक हिंदू बांधव तेथे आले असते आणि जर तेथे काही झाले असते तर आपली पोरं तर गेली असती असती अंगावर. अनेक केसेस आल्या असत्या. त्यांना नाहक जेलमध्ये टाकले गेले असते. तो ससेमिरा लागला असता आणि ऐन निवडणुकीच्या तोंडावर हे सर्व प्रकरण सुरू केले गेले असते. निवडणुका लागल्या असत्या आणि तुम्ही त्या ससेमिऱ्यात अडकला असतात. यामुळे, ही राज्यातली माझी ताकद मला त्यात नाहक लावायची नव्हती. मी पोरांना अडकू देणार नाही, भलेही चार शिव्या खाव्या लागल्या तरी चालतील, असेही राज ठाकरे यावेळी म्हणाले.
आता जाग आली?
आता जाग आली, बारा चौदा वर्षांनंतर, की राज ठाकरेंनी माफी मागितली तरच त्यांना अयोध्येत पाऊल ठेवू देऊ. पण लक्षात ठेवा यामुळे चुकीचे पायंडे पडतायत. २०१७ मध्ये गुजरातमध्ये उत्तर प्रदेश बिहारमधून कामासाठी जी लोकं गेली हेती त्यांच्या पैकी कुणाकडून तरी तेथे एका मुलीवर बलात्कार झाला. यानंतर गुजरातमधून उत्तर प्रदेश आणि बिहारच्या १० ते १५ हजार लोकांना गुजरातमधून हुसकावण्यात आले. ते मुंबईत आले आणि नंतर उत्तर प्रशेद, बिरारमध्ये गेले. त्यांना कोण माफी मागायला लावणार? ज्यांना आपलं हिंदुत्व झोंबलं, लाऊडस्पीक झोंबले, हे आपल्या विरोधात एकत्र येतात. इतरत्र मात्र आपसातच लढत बसणार, असेही राज ठाकरे यावेळी म्हणाले.