पाकिस्तानवर वर्चस्वाची संधी का गमावली? प्रकाश आंबेडकरांचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2025 11:26 IST2025-06-07T11:25:17+5:302025-06-07T11:26:08+5:30

डोनाल्ड ट्रम्प यांनी मध्यस्थी करण्याची गरज नसताना मध्यस्थी झालीच होती तर, पाकिस्तानकडून पुन्हा भारतावर हल्ला होणार नाही असे वदवून का घेतले नाही?

Why did we miss the opportunity to dominate Pakistan? Prakash Ambedkar questions Prime Minister Narendra Modi | पाकिस्तानवर वर्चस्वाची संधी का गमावली? प्रकाश आंबेडकरांचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना सवाल

पाकिस्तानवर वर्चस्वाची संधी का गमावली? प्रकाश आंबेडकरांचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना सवाल

पुणे: भारत-पाकिस्तान संघर्षात पाकिस्तानकडून नेहमीच होणारा दहशतवादाचा त्रास कायमचा मिटविण्याची संधी असताना युद्धबंदी करून ती का गमावली? असा थेट सवाल वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी शुक्रवारी (दि.६) पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना केला. यावेळी भारत-पाकिस्तानमधील संघर्षात तिसऱ्या देशाने म्हणजेच अमेरिकेचे राष्ट्रप्रमुख डोनाल्ड ट्रम्प यांनी मध्यस्थी करण्याची गरज नव्हती. जर मध्यस्थी झालीच होती तर, पाकिस्तानकडून पुन्हा भारतावर हल्ला होणार नाही असे वदवून का घेतले नाही. जर पाकिस्तानचे हल्ले निष्फळ झाले, तर भारतीय हवाई दलाचे नुकसान झाले कसे? हे नुकसान अंतर्गत तोडफोडीमुळे झाले का? असे प्रश्नही उपस्थित केले.

पत्रकार परिषदेत बोलताना आंबेडकर यांनी सिंगापूरमधील शांग्री-ला संवादात भारताचे संरक्षण दलप्रमुख जनरल अनिल चौहान यांनी दिलेल्या वक्तव्याचा संदर्भ दिला. चौहान यांनी भारत-पाकिस्तान संघर्षाच्या पहिल्या दिवशी भारतीय हवाई दलाची मालमत्ता नष्ट झाल्याची कबुली दिली होती. यावरून जाब विचारला की, जर पाकिस्तानचे हल्ले निष्फळ ठरले होते, तर भारताचे नुकसान कशामुळे झाले? हे प्रश्न केवळ राजकीय नसून, देशाच्या सुरक्षेबाबत गंभीर चिंता व्यक्त करणारे आहेत. ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताचे झालेले नुकसान केवळ बाह्य हल्ल्यामुळे की अंतर्गत त्रुटींमुळे? यावर सरकारने स्पष्टीकरण देण्याची गरज असल्याचे सांगितले. ऑपरेशन सिंदूरच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून काढलेल्या तिरंगा विजय फेरीवर टीका करत, भाजप या मोहिमेचे श्रेय घेत असताना, सरकारकडून प्रत्यक्षात काय घडले, यावर पारदर्शक माहिती दिली जात नाही.

आंबेडकर यांनी परराष्ट्र मंत्रालयाच्या आधीच्या ब्रीफिंगची आठवण करून दिली, ज्यात सांगण्यात आले होते की, पाकिस्तानचे ड्रोन आणि क्षेपणास्त्रे भारताने निष्क्रिय केली. याच पार्श्वभूमीवर मग हवाई दलाचे नुकसान कसे झाले? हे नुकसान केवळ शत्रू पक्षामुळे झाले, की आतून कोणी तोडफोड केली? देशाच्या सुरक्षेसंबंधी इतका महत्त्वाचा मुद्दा असताना, पंतप्रधानांनी देशाला काहीही सांगितलेले नाही. त्यांनी देशाची दिशाभूल केली का? असा सवाल केला.

 

Web Title: Why did we miss the opportunity to dominate Pakistan? Prakash Ambedkar questions Prime Minister Narendra Modi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.