पुणे शहराचा पाणीपुरवठा संचारबंदीतही सुरू आहे सुरळीत; जोखीम पत्करत २४ तास काम
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2020 07:00 IST2020-04-14T07:00:00+5:302020-04-14T07:00:11+5:30
मध्यरात्रीपासून ते दिवसभरातील दिलेल्या कोणत्याही वेळेत जाऊन व्हाल्व सोडण्याबरोबरच एखादी पाईपलाईन फुटली तर तिथे तत्काळ हजर होऊन युद्धपातळीवर काम...

पुणे शहराचा पाणीपुरवठा संचारबंदीतही सुरू आहे सुरळीत; जोखीम पत्करत २४ तास काम
राजू इनामदार-
पुणे: एरवी उन्हाळ्यात कायम टिकेच्या टोकावर असलेला शहराचा पाणी पुरवठा कोरोना विषाणूच्या संचारबंदी काळात मात्र सुरळीत सुरू आहे. मागील वीस दिवसात एकदाही पाण्याची समस्या निर्माण न होण्यामागे महापालिकेच्या या विभागातील कर्मचाऱ्यांचे दिवसरात्रीचे श्रम आहेत. मध्यरात्रीपासून ते दिवसभरातील दिलेल्या कोणत्याही वेळेत जाऊन व्हाल्व सोडण्याबरोबरच एखादी पाईपलाईन फुटली तर तिथे तत्काळ हजर होऊन युद्धपातळीवर काम करून घेण्यापर्यंत अनेक कामे या विभागात नेहमी सुरू असतातच, पण आता संचारबंदीच्या पार्श्वभूमीवर ती अधिक काटेकोरपणे सुरू आहेत.
शहरात १ हजार ८०० किलोमीटरच्या वितरिका (जलवाहिन्या) आहेत. जलशुद्धीकरण केंद्र १० आहेत. त्याच्या दुप्पट पंपीग स्टेशन्स आहेत. २०० पेक्षा अधिक लोक दिवसरात्र काम करत आहेत. शहराच्या ५० लाख लोकसंख्येला रोजच्यारोज व्यवस्थित पाणी पुरवठा करणे त्यामुळेच शक्य होत आहे. पर्वती जलशुद्धीकरण केंद्रातील अधीक्षक अभियंता प्रमोद उंडे म्हणाले, ही सगळीच यंत्रणा २४ तास सुरू असते. ती एखादा मिनीटही बंद पडली तरीही पाणी पुरवठा विस्कळीत होते. त्यामुळे विद्यूत विभागापासून ते केंद्रातील वॉटरबेड स्वच्छ करण्यापर्यंत प्रत्येक ठिकाणी कर्मचारी हजर लागतातच.
शहराच्या वेगवेगळ्या भागांमध्ये पाण्याचे व्हॉल्व सोडण्यासाठी काही कर्मचारी आहेत. त्यांना सगळे वेळापत्रक पाळावेच लागते.
या विभागाचे कार्यकारी अभियंता आशिष जाधव व साहेबराव दांडगे यांनी सांगितले. सुरूवातीला व्हॉल्वमनला त्याच्या कामाच्या जागेपर्यंत पोहचण्यात संचारबंदीमुळे अडचणी आल्या. त्यामुळे सर्वांना अत्यावश्यक सेवेची ओळखपत्रे देण्यात आली. आता अडचण येत नाही. गळती किंवा पाईपलाईन फुटल्याच्या तक्रारीही येत असतात. लॉकडाऊन असले तरी ते काम करावेच लागते. अन्यथा त्या परिसराचा पाणी पुरवठा बंद होतो. शहरात दिवसाला किमान २ तरी अशा घटना घडतातच.
...........
पाणी पुरवठा अत्यावश्यक सेवेत येतो. त्याची जाणीव ठेवूनच या विभागातील सर्व अधिकारी, कर्मचारी काम करत आहेत. लॉकडाऊनमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. त्यात पाण्याची आणखी भर पडू नये याची काळजी आम्ही सगळेच मिळून घेत आहोत. त्यांच्या सहकायार्मुळेच आतापर्यंत एकदाही पाणी पुरवठ्यात कसला व्यत्यय आलेला नाही.- अनिरूद्ध पावसकर, मुख्य अभियंता, पाणी पुरवठा, महापालिका