भिगवण : अकलूज येथील सयाजीराजे पार्कमध्ये मित्रांसोबत पर्यटनासाठी गेलेल्या तुषार धुमाळ (वय ३८, रा. तक्रारवाडी, ता. इंदापूर) यांचे पाळणा तुटून झालेल्या दुर्घटनेत अपघाती निधन झाले.
तुषार धुमाळ हे गोल फिरत्या पाळण्यात बसले असताना अचानक पाळण्याची साखळी तुटली. त्यामुळे बसण्याचे टेबल तुटून खाली जोरदार आपटले. त्या झटक्याने तुषार यांच्या मेंदूला गंभीर इजा झाली. त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. या अपघातात इतर तिघे गंभीर जखमी झाले आहे. अधिकच्या माहितीनुसार, या दुर्घटनेत वैभव सोळणकर (रा. बारामती) यांच्यासह आणखी एक पुरुष आणि एक महिला जखमी झाले आहेत. सर्व जखमींवर उपचार सुरू आहेत. ‘माय लाइफ’ या पुण्यातील कंपनीमार्फत विक्रीचे टार्गेट पूर्ण केलेल्या ३०० हून अधिक एजंट अकलूज येथे पर्यटनासाठी गेले होते. त्याच सहलीदरम्यान ही दुर्दैवी घटना घडली. तुषार धुमाळ कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. तुषार धुमाळ यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, भाऊ, आई-वडील असा परिवार आहे. त्यांच्या आकस्मिक निधनामुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.