टिळकांची ‘ती’ खंत आजही कायम : डॉ. नितीन करमळकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2018 18:00 IST2018-08-02T17:54:24+5:302018-08-02T18:00:48+5:30

चांगले शिक्षक दुर्मीळ होत असल्याबाबत टिळकांनी अग्रलेख लिहिला होता.

Tilak's mint still continue at this time : Dr. Nitin Karmalkar | टिळकांची ‘ती’ खंत आजही कायम : डॉ. नितीन करमळकर

टिळकांची ‘ती’ खंत आजही कायम : डॉ. नितीन करमळकर

ठळक मुद्दे‘अग्रलेखकार लोकमान्य टिळक’ या पुस्तकाचे प्रकाशनइतर काही होता येत नाही, मग निदान शिक्षक तरी व्हा, अशा विचाराने तरूण शिक्षकी पेशाकडे

पुणे : ‘चांगले शिक्षक मिळणे दुर्मीळ झाल्याची खंत लोकमान्य टिळक यांनी व्यक्त केली होती. दुर्दैवाने हीच परिस्थिती आजही कायम आहे. आजही चांगले शिक्षक अभावानेच दिसतात. ’, असे मत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. नितीन करमळकर यांनी व्यक्त केले.
उत्कर्ष प्रकाशनतर्फे डॉ. विश्वास मेहंदळे लिखित ‘अग्रलेखकार लोकमान्य टिळक’ या पुस्तकाचे प्रकाशन बुधवारी झाले. या वेळी प्रा. डॉ. करमळकर, ज्येष्ठ विधीज्ञ भास्करराव आव्हाड, सिंबायोसिसचे संस्थापक डॉ. शां. ब. मुजुमदार, प्रकाशक सु.वा. जोशी उपस्थित होते.
करमळकर म्हणाले,‘लोकमान्य टिळकांनी राजकारण, समाजकारण, शिक्षण, आरोग्य, कृषी अशा विविध विषयांवर अग्रलेख लिहिले. त्यांचे महत्त्व कालातीत आहे. ते विचार आजही लागू होतात. चांगले शिक्षक दुर्मीळ होत असल्याबाबत टिळकांनी अग्रलेख लिहिला होता. इतर काही होता येत नाही, मग निदान शिक्षक तरी व्हा, अशा विचाराने तरूण शिक्षकी पेशाकडे वळत आहेत. त्यामुळे शिक्षणक्षेत्राचे नुकसान होत आहे’, असे प्रा. डॉ. करमळकर म्हणाले.
डॉ. मुजूमदार म्हणाले, ‘पूर्वी शिक्षक हे समाजाचा नेते असत. सामाजिक जडणघडणीत शिक्षकी पेशाचे मोठे योगदान होते. आता अगदी विरूद्ध परिस्थिती आहे. रोजगाराभिमुख शिक्षण, प्रशिक्षण, संशोधन, कौशल्यविकास, शैक्षणिक आदानप्रदान आदी बाबतीत लोकमान्य टिळकांनी मांडलेले विचार आजही खरे ठरतात.’
अ‍ॅड. आव्हाड म्हणाले, ‘सध्या सरकारचे डोके ठिकाणावर आहे का, यापेक्षा जनतेचे डोके ठिकाणावर आहे का हे विचारण्याची गरज आहे. राज्यघटनेने दिलेले अधिकार नागरिकांनी वापरले तर लोकशाही सशक्त होईल.समाजात गुणग्राहकतेची गरज असून चांगले नेतृत्व निवडणेही गरजेचे आहे.’ 
‘सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय, राज्य करणे म्हणजे सूड उगवणे नाही असे टिळकांचे अनेक अग्रलेख आजही तंतोतंत लागू पडतात. टिळक की आगरकर हा वाद ब-याचदा दिसतो. परंतु, समाजाच्या उन्नतीसाठी टिळक आणि आगरकर हे धोरण अधिक योग्य ठरेल’, असे मेहंदळे म्हणाले. 
सुधाकर जोशी यांनी प्रास्तविक केले. समीरण वाळवेकर यांनी सूत्रसंचालन केले.

Web Title: Tilak's mint still continue at this time : Dr. Nitin Karmalkar