असे म्हणण्याचे धाडस करणाऱ्यांना त्यांच्या भाषेत उत्तर दिले जाईल; मुरलीधर मोहोळ यांचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2026 10:29 IST2026-01-27T10:28:41+5:302026-01-27T10:29:00+5:30
“महाराष्ट्र हिरवा करण्याची कोणाचीही हिंमत नाही,” असे मोहोळ यांनी ठामपणे सांगितले आहे.

असे म्हणण्याचे धाडस करणाऱ्यांना त्यांच्या भाषेत उत्तर दिले जाईल; मुरलीधर मोहोळ यांचा इशारा
पुणे: 'महाराष्ट्र हिरवा करू' या इम्तियाज जलील यांच्या वक्तव्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. महायुतीच्या नेत्यांकडून या वक्तव्यावर सडकून टिका केली जात आहे. मुंब्रा येथील नगरसेविका शहर शेख यांच्या मुंब्रा हिरवे करू या विधानानंतर जलील यांच्या विधानाने भाजपला आव्हान दिल्याने दिसून आले आहे. अशातच महाराष्ट्र हिरवा करू या विधानाचा केंद्रीय राज्यमंत्री आणि खासदार मुरलीधर यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. महाराष्ट्र हिरवा करण्याची कोणाचीही हिंमत नसल्याचे त्यांनी पुण्यात माध्यमांशी संवाद साधताना सांगितले आहे.
मोहोळ म्हणाले, “महाराष्ट्र हिरवा करण्याची कोणाचीही हिंमत नाही,” असे त्यांनी ठामपणे सांगितले आहे. असे म्हणण्याचे धाडस करणाऱ्यांना त्यांच्या भाषेत उत्तर दिले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे. आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्येही भाजपला मोठे यश मिळेल आणि वर्चस्व राहील, असा विश्वास मोहोळ यांनी यानिमित्ताने व्यक्त केला. पुण्याच्या महापौराबाबत बोलताना त्यांनी पक्षश्रेष्ठी निष्ठेचा, क्षमतेचा आणि अनुभवाचा विचार करून निर्णय घेणार असल्याचे सांगितले आहे. भाजपवर होणारे भ्रष्टाचाराचे आरोप त्यांनी फेटाळून लावत निकाल स्पष्ट झाल्यानंतर आता रडणे बंद करा असा सल्ला त्यांनी विरोधकांना दिला आहे.
नेमकं काय म्हणाले होते जलील
"मी पुन्हा एकदा सांगतोय, ऐका. आमची जी मुलगी निवडून आली आहे सहर, तिच्या विधानावर आम्ही अजिबात वेगळी भूमिका घेत नाहीये. अजिबात नाही. आम्ही पूर्णपणे, पूर्ण ताकदीने एमआयएम पुन्हा एकदा सांगतो आहोत, फक्त मुंब्राचं काय बोलत आहात. येणाऱ्या काळात आम्ही महाराष्ट्र चांगल्या प्रकारे हिरवा करू", असे म्हणत इम्तियाज जलील यांनी भाजपाला आव्हान दिले आहे.
दरम्यान नगरसेविका सहर शेख यांनी काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेत मुंब्रा हिरवा करु वक्तव्यावर स्पष्टीकरण दिलं. 'आमच्या पक्षाचा झेंडाच हिरवा आहे म्हणून मी हिरवा म्हणाले. वेगळ्या रंगाचा असता तर त्या रंगाचा म्हणाले असते. माझ्या हातात हिरवा आणि भगवा असे दोन्ही धागे आहेत. माझ्या वक्तव्याचा विपर्यास करु नका.' तर याच पत्रकार परिषदेत महाराष्ट्र एआयएमआयएमचे(AIMIM) अध्यक्ष इम्तियाज जलीलही उपस्थित होते. त्यांनी 'मुंब्राच काय अख्खा महाराष्ट्र हिरवा करु' असं वक्तव्य केल्याने पुन्हा वादाला तोंड फुटले.