...तर नाराजी घ्यायची ताकद ठेवावी लागते; शरद पवारांनी मांडली स्पष्ट भूमिका
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2025 08:54 IST2025-06-23T08:54:03+5:302025-06-23T08:54:38+5:30
यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने महिला धोरणाच्या त्रिदशकपूर्तीनिमित्त यशस्विनी सन्मान सोहळा आयोजित केला होता. यावेळी शरद पवारांनी भूमिका मांडली.

...तर नाराजी घ्यायची ताकद ठेवावी लागते; शरद पवारांनी मांडली स्पष्ट भूमिका
पुणे : नगर परिषद, जिल्हा परिषद, पंचायत समिती, सहकारी संस्था या सगळ्या ठिकाणी महिलांना आरक्षण दिले. लोकांना सुरुवातीला पटले नव्हते; पण शेवटी ते मान्य केले. हिताच्या बदलांसाठी नाराजी असते; समाजाचे हित असेल, तर ती नाराजी घ्यायची ताकद ठेवावी लागते. कर्तृत्वाचा मक्ता फक्त पुरुषाकडे असतो, ही गोष्ट विसरायला पाहिजे, असे मत माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी व्यक्त केले.
यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने महिला धोरणाच्या त्रिदशकपूर्तीनिमित्त रविवारी यशस्विनी सन्मान सोहळा आयोजित केला होता. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी यशवंतराव चव्हाण सेंटरच्या कार्याध्यक्ष, खासदार सुप्रिया सुळे, लेखक-दिग्दर्शक प्राजक्त देशमुख यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.
यशस्विनी सन्मान कृषी क्षेत्रातील मनीषा सजनपवार, साहित्य क्षेत्रातील डॉ. श्यामल गरुड, उद्योग क्षेत्रातील कमल कुंभार, सामाजिक क्षेत्रातील उल्का महाजन, क्रीडा प्रशिक्षक क्षेत्रातील डॉ. शबनम शेख, पत्रकारिता क्षेत्रातील अलका धुपकर यांना देण्यात आला.
महिलांसंदर्भात देशातील पहिले धोरण हे महाराष्ट्रात तयार केले गेले, याकडे पवार यांनी यावेळी लक्ष वेधले.