लेखाचं उत्तर लेखानं दिलं, तेही वास्तव आणि आकडेवारीसह; देवेंद्र फडणवीस यांचे राहुल गांधींना प्रत्युत्तर
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2025 12:50 IST2025-06-09T12:50:09+5:302025-06-09T12:50:43+5:30
विधानसभा निवडणूक टक्केवारीबाबत राहुल गांधी यांनी घेतलेल्या आक्षेपावर निवडणूक आयोगाने आकडेवारीसह प्रमाण दिले आहे

लेखाचं उत्तर लेखानं दिलं, तेही वास्तव आणि आकडेवारीसह; देवेंद्र फडणवीस यांचे राहुल गांधींना प्रत्युत्तर
पुणे : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील मतांच्या टक्केवारीबाबत राहुल गांधी यांनी घेतलेल्या आक्षेपावर निवडणूक आयोगाने आकडेवारीसह प्रमाण दिले आहे. याबाबत सांगताना ‘लेखाचं उत्तर लेखानं दिलं आहे, त्यामुळे आता तरी मला वाटतं राहुल गांधी यापुढे अशा प्रकरचं बोलणं सोडतील’, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. पुण्यातील औंध येथील महाऊर्जाच्या नवीन प्रशासकीय इमारतीच्या उद्घाटन कार्यक्रमानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
यावेळी कारागृह विभागाचे तत्कालीन अतिरिक्त महासंचालक अमिताभ गुप्ता आणि कारागृह विभागाचे विशेष पोलिस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर यांच्या विरोधात झालेल्या आरोपांबाबत माध्यम प्रतिनिधींनी प्रश्न विचारला असता, ज्या आरोपांबाबत पुरावे असतील आणि त्यात तथ्य असेल, तर त्याची पूर्ण चौकशी होईल आणि कारवाई होईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
सामाजिक न्याय व मागासवर्ग विभागाचा निधी लाडक्या बहिणींसाठी वळविल्याच्या प्रश्नावर बोलताना अर्थ संकल्पातील नियमानुसार अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती यांच्या वैयक्तिक लाभाच्या योजना त्यांच्या हेडखालीच दाखवाव्या लागतात. त्याची तरतूदही त्या हेडखालीच करावी लागते आणि म्हणूनच अजित पवार यांनी अर्थसंकल्प मांडताना त्या हेडखाली ती तरतूद केली. नेहमीच्या तरतुदीपेक्षा किती जास्त तरतूद केली आहे आणि ती कशाकरिता वापरणार आहोत, हे त्यांनी तसे भाषणातही सांगितले. दुसऱ्या एखाद्या कामाकरिता निधी ठेवला असेल आणि तो तिसऱ्या कामावर खर्च केला, तर त्याला निधी वळवला असे म्हटले जाते. अर्थसंकल्पात जर कायद्यानेच त्या विभागाकरिता किंवा घटकाकरिता जो पैसा खर्च होतो, तो त्या घटकाच्या मंत्रालयात दाखवावा लागत असेल, तर ते चूक नाही. तो खर्च करणे सुद्धा चूक नाही. पैसा कुठेही वळवलेला नाही. त्या विभागातच तो पैसा दाखवणे हे अर्थसंकल्पाचे बंधन आहे, त्याप्रमाणे तो अर्थसंकल्पात दाखविला आहे आणि खर्च केला असल्याचे त्यांनी सांगितले.