'आप' चा आता ‘स्वराज्य संवाद’; महाराष्ट्रात पक्षाचे ५ लाख सदस्य करण्याचा संकल्प
By राजू इनामदार | Updated: June 14, 2023 16:07 IST2023-06-14T16:07:12+5:302023-06-14T16:07:48+5:30
राज्यातील शिंदे फडणवीस सरकार सर्वेक्षणातील आकडेवारीबद्दल कितीही सांगत असले तरी त्यात तथ्य नाही, 'आप' ची टीका

'आप' चा आता ‘स्वराज्य संवाद’; महाराष्ट्रात पक्षाचे ५ लाख सदस्य करण्याचा संकल्प
पुणे: दिल्ली, पंजाब नंतर आम आदमी पार्टीने (आप) महाराष्ट्राकडे नजर वळवली आहे. पंढरपूर ते रायगड अशा ८०० किलोमीटरच्या स्वराज्य यात्रेनंतर आप आता महाराष्ट्रात ‘स्वराज्य संवाद’ सुरू करत आहे. यात राज्यात पक्षाचे ५ लाख सदस्य करण्याचा संकल्प करण्यात आला आहे.
पक्षाच्या वतीने जिल्हाध्यक्ष मुकुंद किर्दत, पुणे शहर कार्याध्यक्ष विजय कुंभार यांनी ही माहिती दिली. आम आदमी पार्टीला आता राष्ट्रीय राजकीय पक्ष म्हणून मान्यता मिळाली आहे. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये, विशेषत: ग्रामीण भागात ग्रामपंचायत, तालुका पंचायतीत आप ने खाते उघडले आहे. आता मोठी राजकीय महत्वाकांक्षा बाळगत पक्षाने महाराष्ट्रात संघटना बांधणी सुरू केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून पंढरपूर ते रायगड अशी स्वराज्य यात्रा काढण्यात आली असे किर्दत यांनी सांगितले. या यात्रेला मिळालेला प्रतिसाद लक्षात घेत आता स्वराज्य यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.
या यात्रेत थेट मतदारांबरोबर संवाद करण्यात येणार आहे. त्यासाठी शहरी तसेच ग्रामीण भागातही पक्ष कोपला सभा घेईल. त्यामध्ये नागरिकांना पक्षाची दिल्ली, पंजाब मधील कामगिरी सांगितली जाईल. दिल्ली महापालिका तसेच दिल्ली राज्यात सर्वसामान्य जनतेसाठी राबवलेल्या विविध योजना, त्यांना मिळालेला प्रतिसाद, लाभार्थी नागरिकांची मते याची माहीती नागरिकांना दिली जाणार आहे. गुजरात महापालिकेत भाजपच्या लाटेतही आप चे २३ नगरसेवक निवडून आणणारे पक्षाचे राज्याचे प्रभारी गोपाळ इटालिया या स्वराज्य यात्रेचे महाराष्ट्रातील मार्गदर्शक असतील असे किर्दत म्हणाले.
राज्यातील शिंदे फडणवीस सरकार सर्वेक्षणातील आकडेवारीबद्दल कितीही सांगत असले तरी त्यात तथ्य नाही. त्यांनीच पैसे देऊन नियुक्त केलेली संस्था त्यांनाा हवे तसे सर्वेक्षण करणार, हवा तसा निष्कर्ष काढणार हे राज्यातील जनतेला समजणार नाही असे त्यांना वाटते, आप ला या सरकारबद्दल तीव्र नाराजी दिसून आली आहे. त्यामुळेच पक्षाने राज्यातील संघटन वाढण्याचा निर्णय घेतला. ही मोहिम त्याचाच एक भाग असल्याचे किर्दत यांनी सांगितले. कुंभार तसेच अजित फाटके पाटील, एकनाथ ढोले शहर संघटक, धनंजय बनकर प्रवक्ते, अमित म्हसे यावेळी उपस्थित होते.