Suresh Kalmadi Passes Away : विद्येच्या माहेरघराला क्रीडानगरीची ओळख देणारा नेता
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2026 17:12 IST2026-01-06T17:10:22+5:302026-01-06T17:12:31+5:30
पुणे पूर्वीपासूनच विद्येचे माहेरघर म्हणून ओळखले जाते; पण कलमाडी यांच्यामुळे पुण्याला क्रीडानगरी म्हणून ओळख मिळाली.

Suresh Kalmadi Passes Away : विद्येच्या माहेरघराला क्रीडानगरीची ओळख देणारा नेता
पुणे : पुण्याच्या क्रीडा विश्वाची ओळख माजी खासदार व केंद्रीय मंत्री सुरेश कलमाडी यांच्याशिवाय अपूर्ण आहे. पुण्याचे नाव जागतिक क्रीडा नकाशावर नेण्यात त्यांचे मोलाचे योगदान आहे. पुणे पूर्वीपासूनच विद्येचे माहेरघर म्हणून ओळखले जाते; पण कलमाडी यांच्यामुळे पुण्याला क्रीडानगरी म्हणून ओळख मिळाली.
भारतीय ऑलिम्पिक संघटना (आयओए) आणि आशियाई ॲथलेटिक्स संघटनेचे अध्यक्ष म्हणून सुरेश कलमाडी यांनी दीर्घकाळ काम पाहिले. १९९६ ते २०१२ या कालावधीत ते या संघटनेतील महत्त्वाच्या पदांवर निवडून येत होते. त्याचा थेट फायदा पुण्याच्या पायाभूत सुविधांना झाला.
कलमाडी यांचे सर्वात मोठे आणि महत्त्वाचे योगदान म्हणजे पुण्यातील म्हाळुंगे-बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलाची उभारणी हे होय. १९९४ मध्ये पुण्यात झालेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांसाठी त्यांनी या जागतिक दर्जाच्या संकुलाची उभारणी केली. या प्रकल्पामुळे पुण्याला आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्टेडियम, शूटिंग रेंज, बॅडमिंटन कोर्ट आणि जलतरण तलाव मिळाले. त्यामुळे महाराष्ट्रातील खेळाडूंना सरावासाठी एक हक्काचे ठिकाण मिळाले.
२००८ मध्ये पुण्यात युवा राष्ट्रकुल स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेमुळे पुण्याच्या क्रीडा पायाभूत सुविधांचे आधुनिकीकरण झाले. जगभरातील ७१ देशांतील खेळाडू पुण्यात आले होते. त्यामुळे शहराची प्रतिमा आंतरराष्ट्रीय स्तरावर उंचावली. बालेवाडी संकुलाचे नूतनीकरण याच काळात करण्यात आले.
कलमाडी यांनी केवळ मैदाने बांधली नाहीत, तर विविध खेळांच्या अकादमी पुण्यात कशा येतील, यासाठी प्रयत्न केले. कुस्ती, नेमबाजी, टेनिस, बॅडमिंटन आणि तिरंदाजी यांसारख्या खेळांना त्यांनी नेहमीच पाठबळ दिले. त्यांच्या कार्यकाळात पुण्यात अनेक आशियाई स्तरावरील स्पर्धांचे आयोजन झाले. त्यामुळे पुण्यात क्रीडा संस्कृती रुजण्यास आणि आंतरराष्ट्रीय खेळाडू घडवण्यास मदत झाली. या काळात अनेक खेळाडू राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकले.
सुरेश कलमाडी यांच्या कारकिर्दीत काही वाद निर्माण झाले असले, तरी पुण्याच्या क्रीडा क्षेत्राचा पाया रचण्यात त्यांचे योगदान नाकारता येणार नाही. आज बालेवाडी संकुलातून जे आंतरराष्ट्रीय खेळाडू तयार होत आहेत, त्यामागे कलमाडी यांनी पाहिलेले पुण्याचे ‘स्पोर्ट्स सिटी’चे स्वप्न कारणीभूत आहे. सुरेश कलमाडी यांच्या जाण्याने पुण्याच्या क्रीडा क्षेत्राचे मोठे नुकसान झाले आहे.
आंतरराष्ट्रीय मॅरेथाॅनमुळे नवी ओळख
कलमाडी यांच्या पुढाकारामुळे पुण्यात आंतरराष्ट्रीय मॅरेथाॅन स्पर्धेला सुरुवात करण्यात आली. १९८३पासून सुरू झालेली ही स्पर्धा आजही पुण्याची एक ओळख आहे. या स्पर्धेमुळे पुण्यात धावण्याची संस्कृती रुजली आणि स्थानिक धावपटूंना आंतरराष्ट्रीय धावपटूंसोबत स्पर्धा करण्याची संधी मिळाली. इथिओपिया, नायजेरिया, केनिया यांसह जगभरातील धावपटू आजही पुणे मॅरेथाॅनसाठी आवर्जून उपस्थिती लावतात. तसेच, शेकडो पुणेकरही या स्पर्धेत धावतात आणि धावपटूंना प्रोत्साहन देतात.