शरद पवार यांच्या वक्तव्याने महाविकास आघाडीत अस्वस्थता
By राजू इनामदार | Updated: May 9, 2025 19:15 IST2025-05-09T19:08:09+5:302025-05-09T19:15:07+5:30
दोन्ही राष्ट्रवादीचे एकत्रीकरण : पवार राजकीय विश्वासार्हता पणाला लावणार नाहीत

शरद पवार यांच्या वक्तव्याने महाविकास आघाडीत अस्वस्थता
पुणे : अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर जायचे किंवा नाही याचा निर्णय नवीन पिढी घेईल, या ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या वक्तव्याने महाविकास आघाडीत काँग्रेस व शिवसेना (उद्धव ठाकरे) या प्रमुख पक्षांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. पवार या प्रकारचा निर्णय घेणार नाहीत, असे आघाडीच्या काही नेत्यांना वाटते, तर राजकारणात काहीही होऊ शकते, असे काहींचे मत आहे.
आमच्या पक्षात एक गट अजित पवार यांच्याबरोबर जावे या मताचा आहे, तर दुसरा जाऊ नये, या मताचा. यासंबंधीचा निर्णय नवी पिढी घेईल, खासदार सुप्रिया सुळे यांचा यात पुढाकार असेल, असे शरद पवार यांनी जाहीरपणे सांगितले. त्याचबरोबर ‘मी या प्रक्रियेत नाही’, अशी पुस्तीही त्यांनी जोडली आहे. महापालिकेच्या निवडणुका तोंडावर आहेत, त्याच्या तयारीत सर्वच राजकीय पक्ष गुंतले आहेत, महाविकास आघाडी म्हणून भारतीय जनता पक्षाबरोबर लढण्याची मोर्चेबांधणी सुरू असतानाच ऐनवेळी पवार यांनी असे भाष्य केल्याने महाविकास आघाडीतील काँग्रेस, शिवसेना या प्रमुख पक्षांसह त्यांच्या बरोबर असलेल्या समविचारी पक्षांच्या नेते, पदाधिकारी, कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे.
काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष, माजी आमदार मोहन जोशी यांनी सांगितले की, पवार असा काही निर्णय घेतील, असे वाटत नाही. त्यातही राजकीय जीवनाच्या अशा टप्प्यावर ते स्वत:ची विश्वासार्हता पणाला लावणार नाहीत. पण, पक्षातील लोकप्रतिनिधींच्या दबावामुळे असा काही निर्णय झालाच, तर त्याचा काँग्रेसवर काहीही परिणाम होणार नाही. राज्यघटना प्रमाण मानणाऱ्या, तसेच धर्मनिरपेक्षतेवर विश्वास असणाऱ्या समविचारी पक्षांना बरोबर घेत भारतीय जनता पक्षाला पराभूत करणे हा काँग्रेसचा उद्देश आहे. तेच धोरण आहे. त्यानुसार आम्ही वाटचाल करणार.
शिवसेना (उद्धव ठाकरे) गटाचे शहराध्यक्ष संजय मोरे यांनी सांगितले की, ही चर्चा अजित पवार फुटून सत्तेत सहभागी झाले तेव्हापासून सुरू आहे. त्यामुळे हा निर्णय होईलच असे नाही. मात्र, निर्णय घेण्यापूर्वी खासदार सुप्रिया सुळे किंवा त्यांच्या सर्व लोकप्रतिनिधींनी ते महाविकास आघाडी म्हणून निवडून आले आहेत, मतदारांनी त्यांना त्यासाठी मते दिली आहेत, हे लक्षात घ्यावे. आपले लोकप्रतिनिधीत्व कायम ठेवून त्यांनी एकत्रीकरणाचा निर्णय घेतला, तर मग फुटून बाहेर पडत पक्षचिन्हही चोरणारे व हे यांच्यात काहीच फरक राहणार नाही. एकत्रीकरण झालेच, तर आमचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे काय ते ठरवतील. आमच्यासाठी ते महत्त्वाचे आहे.