पथनाट्याची शिदोरी हेच आजवरच्या यशाचे गमक- मकरंद अनासपुरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2019 03:22 IST2019-01-28T03:22:16+5:302019-01-28T03:22:40+5:30

पथनाट्यामुळे अभिनय करताना प्रसंगावधान, हजरजबाबीपणा; तसेच कोणत्याही परिस्थितून मार्ग काढणे आदी गोष्टी सहज शक्य होतात. मग, ते नाटक असो किंवा चित्रपट किंवा सूत्रसंचालन आणि हे मी स्वअनुभवातून सांगतो असे अनासपुरे म्हणाले.

Shanti of Pathnata is the same as the gamak- Makrand Anaspura of the success of success | पथनाट्याची शिदोरी हेच आजवरच्या यशाचे गमक- मकरंद अनासपुरे

पथनाट्याची शिदोरी हेच आजवरच्या यशाचे गमक- मकरंद अनासपुरे

पुणे : ‘पथनाट्याची शिदोरी’ हेच माझ्या आजवरच्या अभिनय क्षेत्रातील यशस्वी वाटचालीचे खरे गमक आहे असे मत अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी व्यक्त केले. पथनाट्यामुळे अभिनय करताना प्रसंगावधान, हजरजबाबीपणा; तसेच कोणत्याही परिस्थितून मार्ग काढणे आदी गोष्टी सहज शक्य होतात. मग, ते नाटक असो किंवा चित्रपट किंवा सूत्रसंचालन आणि हे मी स्वअनुभवातून सांगतो असे अनासपुरे म्हणाले.

सिम्बायोसिस सांस्कृतिक महोत्सवाच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित केलेल्या प्रकट मुलाखती दरम्यान ते बोलत होते.
मकरंद अनासपुरे यांच्या बरोबरच अभिनेते सुबोध भावे यांना देखील निमंत्रित केले होते. आयुष्यात ठरवून केलेल्या गोष्टींपेक्षा न ठरवता केलेल्या गोष्टी जास्ती यशस्वी होतात असा माझा अनुभव असल्याचे सुबोध भावे यांनी नमूद केले.

मकरंद अनासपुरे यांनी नाम फाउंडेशनबद्दल विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले, २००८ मध्ये एका चित्रपटातील त्यांनी केलेली शेतकऱ्याची भूमिका ही नाम फाउंडेशनच्या निर्मितीची प्रेरणास्थान ठरली. या संस्थेने शेतकºयांच्या मदतीसाठी आयोजित केलेला पहिला कार्यक्रम हा बीड येथे, तर दुसरा नागपूर येथे पार पडला आणि तेव्हापासून ते आजपर्यंत या संस्थेने अनेक सामाजिक उपक्रम राबवले व सध्या ही संस्था एकूण ३६ वेगवेगळ्या हेड्स खाली काम करते आहे. किलोमीटरच्या भाषेत सांगायचे झाल्यास आज पर्यंत २२०० किलोमीटरपेक्षा जास्ती अंतराचे काम या संस्थेने पूर्ण केले आहे.

धरणातील गाळ काढून तो शेतकºयांना देणे त्यामुळे शेतकºयांच्या जमिनी सुपीक होतील व धरणाची पाणी साठवणूक करण्याची क्षमता वाढेल हे काम महाराष्ट्रातील सर्व धरणांमध्ये केल्यास पाण्याचा, तसेच जमीन नापीक होण्याचा प्रश्न निश्चितच सोडवता येईल असेही ते म्हणाले. याप्रसंगी सिम्बायोसिसचे संस्थपाक व अध्यक्ष डॉ. शां. ब. मुजुमदार, प्रधान संचालिका डॉ. विद्या येरवडेकर उपस्थित होत्या.

अनासपुरे म्हणाले की, मराठीसाठी हक्काची चित्रपटगृहे नसल्याची खंत आहे. तसेच मल्टिप्लेक्सचे तिकीटदर हे सर्वसामान्यांना न परवडणारे आहे. यावर उपाय म्हणून मराठीसाठी हक्काची चित्रपटगृहे उपलब्ध करून देण्याबरोबरच माफक तिकीट दर ठेवणे हेदेखील तितकेच महत्त्वाचे आहे.

Web Title: Shanti of Pathnata is the same as the gamak- Makrand Anaspura of the success of success