‘आयटी’नगरीतील रस्ते अवघ्या ४० मिनिटांत पाण्याखाली; पाण्याचे नैसर्गिक प्रवाह बुजवल्याचा फटका
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2025 22:29 IST2025-06-07T22:29:45+5:302025-06-07T22:29:55+5:30
हिंजवडीतील चित्र, प्रशासन हतबल; पावसाचे पाणी बांधकामे, सीमा भिंत, तसेच मेट्रोच्या कामांमुळे अडते

‘आयटी’नगरीतील रस्ते अवघ्या ४० मिनिटांत पाण्याखाली; पाण्याचे नैसर्गिक प्रवाह बुजवल्याचा फटका
हिंजवडी : आयटीनगरी परिसराला शनिवारी (दि.७) दुपारी बाराच्या सुमारास जोरदार पावसाने झोडपून काढले. ढगांच्या कडकडाटासह सुमारे चाळीस मिनिटे आलेल्या मुसळधार पावसामुळे येथील रस्ते पाण्याखाली गेले. रस्त्यांना अक्षरशः नदीचे स्वरूप प्राप्त झाल्याने, परिसरातील वाहतूक काहीकाळ ठप्प होऊन, वाहनांच्या लांब रांगा लागल्या होत्या.
मोठ्या पावसात हिंजवडी येथील मुख्य रस्त्यांवर वारंवार मोठ्या प्रमाणावर पाणी साचत आहे. यावर उपाययोजना करण्यात प्रशासन कमी पडत असून, परिसरातील पाण्याचे नैसर्गिक प्रवाह बुजवल्यामुळे अशी परिस्थिती उद्भवत असल्याची चर्चा आहे.
प्रामुख्याने आयटीपार्क फेज तीन हद्दीतील कॉड्रन कंपनी परिसरात नेहमीच रस्त्यावर पाणी साचत असते. येथील मारुंजी आणि माणच्या वेशीवर असलेल्या डोंगरपठारावरील वाहून आलेले पावसाचे पाणी येथे झालेली बांधकामे, सीमा भिंत, तसेच मेट्रोच्या कामामुळे अडून राहत आहे. पाणी वाहून नेणारा नैसर्गिक प्रवाह थांबल्याने मुख्य रस्त्यावर सुमारे चार फूट पाणी साठते. चारशे मीटरपर्यंत रस्ता पाण्याखाली जात असतो.
अशीच परिस्थिती फेज दोन येथील पद्मभूषण चौकाजवळील आणि घोटावडे-माण रस्त्यावरील गवारे मळा येथेसुद्धा आहे. त्यामुळे वाहतूक ठप्प होऊन वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत असतात. दरवर्षी पावसाळ्यात अशीच परिस्थिती असते. याला आयटीयन्ससह स्थानिक ग्रामस्थ पुरते वैतागले असून, ‘एमआयडीसी’ तसेच ‘पीएमआरडीए’च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पाहणी करून कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.
या ठिकाणी साचते रस्त्यांवर पाणी
आयटीपार्कमधील फेज तीन ते फेज दोनपर्यंत मुख्य रस्ता, फेज दोनजवळील पद्मभूषण चौक परिसर, घोटावडे-माण रस्तावरील गवारे मळा, माणदेवी चौक, राक्षेवस्ती, बोडकेवाडी फाटा, शिवचा ओढा, वडजाईनगर, तसेच, बोडकेवाडी फाटा ते जॉय व्हीला सोसायटी रस्ता, धुमाळ वस्ती पाणंद रस्ता, हिंजवडी हद्दीतील भटेवरानगर, विनोदे वस्ती, तसेच भूमकर चौक अंडरपास.
फेज तीन आणि दोन परिसरात डोंगरउतार आहे. त्यामुळे पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी उपाययोजना गरजेच्या आहेत. नैसर्गिक प्रवाह खुले ठेवले पाहिजेत.- अतुल भिंगेल रहिवासी, फेज दोन, हिंजवडी.
फेज तीन आणि दोन हद्दीत सुरू असलेली विकासकामे डोकेदुखी ठरत आहेत. आडमुठ्या ठेकेदारांमुळे नैसर्गिक प्रवाह बंद झाले आहेत. निसर्गाचा समतोल ढासळला आहे. - गणेश परदेशी, व्यावसायिक, माण.