Raj Thackeray in Pune : निवडणुका नसताना उगाच कशाला भिजत भाषण करायचं; राज ठाकरेंचा शरद पवारांना अप्रत्यक्ष टोला
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2022 11:55 IST2022-05-22T11:44:41+5:302022-05-22T11:55:10+5:30
मला मुंबई, दिल्ली, उत्तर प्रदेशातून लोक माहिती देत होते. एक वेळ आली तेव्हा मला हा सापळा असल्याचं लक्षात आलं, अयोध्या दौऱ्याबाबत राज ठाकरे यांचं वक्तव्य.

Raj Thackeray in Pune : निवडणुका नसताना उगाच कशाला भिजत भाषण करायचं; राज ठाकरेंचा शरद पवारांना अप्रत्यक्ष टोला
“अयोध्या दौरा रद्द म्हटल्यावर अनेकांना वाईट वाटलं, अनेकांना आनंद झाला. म्हणून मी दोन दिवसांचा बफर दिला होता. जे बोलायचंय ते बोलून घ्या. अयोध्येला जाणार याची घोषणा सुरू केली होती. त्यानंतर हे प्रकरण सुरू झालं. काय चाललंय हे मी पाहत होतं. मला मुंबई, दिल्ली, उत्तर प्रदेशातून लोक माहिती देत होते. एक वेळ आली तेव्हा मला हा सापळा असल्याचं लक्षात आलं. यात अडकलं नाही पाहिजे असं वाटलं. या सगळ्याची सुरूवात रसद पुरवली गेली ती महाराष्ट्रातून झाली. हा पुन्हा विषय बाहेर काढा असं सांगण्यात आलं. माझी अयोध्या वारी खुपली असे बरेच जण होते” असं मनसे प्रमुख राज ठाकरे म्हणाले. पुण्यात आयोजित केलेल्या सभेदरम्यान त्यांनी आपल्या अयोध्या दौऱ्याबाबत वक्तव्य केलं.
राज ठाकरे यांच्या सभेदरम्यान, काही अंध विद्यार्थ्यांनीही हजेरी लावली होती. भाषणापूर्वी राज ठाकरे यांनी त्यांना मंचावर बोलावून स्थान दिलं. “आपल्या सभांना हॉल परवड नाही. एसपी कॉलेजलाही विचारलं होतं. तेव्हा त्यांनी कोणालाच जागा देत नाही असं म्हटलं. पण आता आम्हाला नाही तर कोणालाही नाही,” असं राज ठाकरे म्हणाले. निवडणुका नाही काही नाही उगाच का भिजत भाषण करा, असं म्हणत त्यांनी अप्रत्यक्षरित्या शरद पवार यांना टोला लगावला. “सध्या पायाचं दुखणं सुरू आहे त्यामुळे कंबरेलाही त्रास होतो. येत्या १ तारखेला शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे,” अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.
"मी अयोध्येला जाणार याचा विचार मनात होता. रामजन्मभूमीचं दर्शन घेणं हे आलंच. तुमच्यापैकी अनेक जण तेव्हा जन्मालाही आले नसतील. तेव्हा आजच्यासारखे चॅनल्स नव्हते. तेव्हा दूरदर्शनच होतं. तेव्हा न्यूज रिल्स चालवल्या जायच्या. आजही डोळ्यासमोर ते चित्र आहे जेव्हा मुलायम सिंह सरकार होतं, जेव्हा भारतातून कार सेवक त्या ठिकाणी गेले होते तेव्हा सर्व कारसेवकांना ठार मारण्यात आलं होतं. त्या सर्वांची प्रेतं शरयू नदीत तरंगताना व्हिज्युअल पाहिली होती. जिथे माझे कारसेवक गेले त्याचंही दर्शन मला घ्यायचं होतं. राजकारणात अनेकांना भावना समजत नसतात," असंही ते म्हणाले.
सभेसाठी मनसेच्या कार्यकर्त्यांनी शहरात ठिकठिकाणी फलक लावून वातावरण निर्मिती केली होती. या सभेला मोठ्या प्रमाणात मनसैनिकांनी हजेरी लावली होती.. त्यामुळे पोलिसांकडून रविवारी सकाळपासून स्वारगेट परिसरात मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
अटी शर्थींवर परवानगी
दरम्यान, राज ठाकरेंनी धार्मिक भावना दुखावणारी तसेच चिथावणीखोर वक्तव्ये सभेत करू नयेत, आदी विविध १३ अटी पोलिसांनी घातल्या होत्या. राज ठाकरे यांनी धार्मिक भावना दुखावणारी तसेच चिथावणीखोर वक्तव्ये करू नयेत. घोषणाबाजी करू नये तसेच सभेला येणाऱ्यांनी सभेला येताना किंवा सभा संपल्यानंतर वाहन फेऱ्या काढू नयेत, यासह विविध १३ अटींवर सभेला परवानगी देण्यात आली, असल्याचे अतिरिक्त पोलीस आयुक्त राजेंद्र डहाळे यांनी सांगितलं होतं.
उद्धव ठाकरेंचा टोला
काही दिवसांपूर्वी मला एका शिवसैनिकाचा फोन आला. तो मला विचारत होता, साहेब तुम्ही लगे रहो मुन्नाभाई पाहिलात का? मी त्याला विचारलं, त्याचा काय संबंध? तर तो म्हणाला, त्या चित्रपटात संजय दत्तला सगळीकडे गांधीजी दिसत होते. आपणच गांधीजी झाल्यासारखं त्याला वाटत होतं. तसं सध्या एकाला वाटू लागलंय. हल्ली एक मुन्नाभाई फिरतोय, असा टोला ठाकरेंनी लगावला होता.
सध्या एकजण भगवी शाल पांघरून फिरतोय. आपणच बाळासाहेब असं त्याला वाटू लागलंय. पण मुन्नाभाई चित्रपटाच्या शेवटी संजय दत्तला कळतं की आपल्या डोक्यात केमिकल लोचा झाला आहे. तसंच यांचंही झालंय. त्यामुळे यांना फिरू द्या. कधी ते मराठीचा मुद्दा घेऊन फिरतील. कधी हिंदूंचा मुद्दा घेऊन येतील. त्यांच्याकडे लक्ष देण्याची गरज नाही, असा चिमटा उद्धव ठाकरेंनी काढला.