तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2025 10:10 IST2025-06-16T09:59:12+5:302025-06-16T10:10:16+5:30
मावळ येथे पूल कोसळण्याच्या घटनेनंतर राज ठाकरे यांनी सरकारवर ताशेरे ओढले आहेत.

तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
Pune Maval bridge collapse: पुण्याच्या मावळ तालुक्यातील कुंडमळा येथील इंद्रायणी नदीवरील लोखंडी पूल रविवारी कोसळला. सुट्टीच्या पर्यटकांची मोठी गर्दी असतानाच दुपारी साडेतीनच्या दरम्यान हा लोखंडी पूल अचानक कोसळला. या दुर्घटनेत पुलावरून अनेक पर्यटक नदीत पडले आणि वाहून गेले. यातील पाच जणांचा मृत्यू झाला असून ५२ जणांना वाचवण्यात आलं. या घटनेनंतर तात्काळ मदतकार्य सुरु करण्यात आलं. आता या घटनेवरुन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांवर टीकास्त्र डागलं आहे.
मावळ तालुक्यातील कुंडमाळा येथे रविवारी दुपारी इंद्रायणी नदीवरील साकव पूल कोसळून झालेल्या गंभीर दुर्घटनेत पाच जणांचा मृत्यू झाला. १९९३ साली इंद्रायणी नदीवर शेलारवाडीकडून इंदोरीकडे जाण्यासाठी साकव पूल उभारण्यात आला होता. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने नवीन पुलाची निर्मिती करण्याचे नियोजन करण्यात आले होते. मात्र प्रत्यक्षात त्याचे काम झाले नाही. रविवारी पर्यटकांची गर्दी असतानाच हा पूल कोसळला. राज ठाकरे यांनी एक्स पोस्टवरुन या दुर्घटनेवरुन सरकारवर ताशेरे ओढले आहेत.
"काल मावळ तालुक्यातील कुंडमाळा गावाजवळ इंद्रायणी नदीवरचा जुना झालेला लोखंडी पूल कोसळला. त्यात अनेक जणं वाहून गेलेत आणि काही जणं मृत्युमुखी पडलेत. नक्की हानी किती झाली आहे याचा अंदाज आला नाहीये. या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची भावपूर्ण श्रद्धांजली. हा पूल धोकादायक होता तर तिथे पूर्ण प्रवेशबंदी का नाही झाली हा प्रश्न आहेच. जर पूल धोकादायक झाला होता तर तो पाडून नव्याने पूल का नाही झाला? प्रत्येक घटनेच्या नंतर सरकारमध्ये बसलेल्यांची एक ठराविक प्रतिक्रिया येते की,'बचावकार्य वेगाने सुरु आहे आणि सरकार बाधित नागरिकांच्या पाठीशी खंबीर उभं आहे.' पण मुळात हा प्रसंग का येतो? सरकारचे इतके विभाग आहेत, ते नक्की काय करतात? त्यांनी दर काही महिन्यांनी किंवा या घटनेपुरतं बोलायचं झालं तर पावसाळयाच्या आधी धोकादायक पूल कुठले आहेत, त्याची तपासणी, त्याची एकतर दुरुस्ती किंवा ते बंद करणे असं काही नियोजन करता येत नाही? बरं प्रशासन करत नसेल तर इतकी वर्ष सत्तेत असलेल्यांना याचं नियोजन करून प्रशासनाकडून कामं करून का घेता येत नाहीत? आणि जर येत नसतील तर मग तुमच्या सत्तेचा अनुभव नक्की कुठला आणि त्याचा तुम्हाला असेल उपयोग पण राज्याला काय उपयोग?" असा सवाल राज ठाकरे यांनी केला.
"पण लोकांनी देखील उत्साहाला थोडा आवर घालायला हवा. अशा धोकादायक ठिकाणी जाताना, आपल्या कुटुंबाला घेऊन जाताना थोडं भान ठेवायला हवं. अर्थात म्हणून सरकारची जबाबदारी कमी होते असं नाही. पण सरकार जर निष्काळजीपणा दाखवणार असेल तर आपणच सतर्क रहायला हवं. आत्ता कुठे मान्सूनच्या पावसाला सुरुवात झाली आहे तर राज्यातल्या बऱ्याच शहरांत पाणी साठणं, रस्त्यांची चाळण होणं, पूल पाडणं अशा घटना सुरु झाल्यात. या सगळ्यात सरकारने आतातरी युद्धपातळीवर काम करून नागरिकांना कमीत कमी त्रास होईल हे पहावं," असं आवाहन राज ठाकरे यांनी केले.