Pune ZP Election Result 2026 : थेऊरमध्ये कोण कुणासोबत? निकालानेच दिला राजकीय इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2026 17:44 IST2026-02-10T17:43:24+5:302026-02-10T17:44:28+5:30
- हवेलीत राष्ट्रवादी (अप)चा डंका; थेऊर-आव्हाळवाडीत भाजपचा धुव्वा

Pune ZP Election Result 2026 : थेऊरमध्ये कोण कुणासोबत? निकालानेच दिला राजकीय इशारा
उरुळी कांचन : हवेली तालुक्यातील जिल्हा परिषद गट क्रमांक ४० (थेऊर-आव्हाळवाडी) आणि पंचायत समिती गण क्रमांक ७९ व ८० मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने (अजित पवार गट) दणदणीत विजय मिळवत विरोधकांना जबर धक्का दिला आहे. तिकीट वाटपापासून प्रचाराच्या अखेरपर्यंत सुरू असलेल्या अंतर्गत चुली, मतभेद आणि राजकीय चर्चांवर मात करत राष्ट्रवादीच्या तिन्ही उमेदवारांनी भाजपचा पूर्णपणे धुव्वा उडवला.
जिल्हा परिषद गट क्रमांक ४० मध्ये राष्ट्रवादीच्या कोमल संदेश आव्हाळे यांनी तब्बल १४ हजार १४६ मतांच्या फरकाने विजय मिळवत गटातील आपले वर्चस्व अधोरेखित केले. आव्हाळे यांना २२ हजार ३४३ मते, तर भाजपच्या पुष्पलता प्रकाश सावंत यांना केवळ ८ हजार १९७ मते मिळाली. एवढ्या मोठ्या फरकामुळे थेऊर गटात राष्ट्रवादी काँग्रेसची पकड किती मजबूत आहे, हे स्पष्ट झाले.
पंचायत समिती गण क्रमांक ७९ (थेऊर) मध्ये राष्ट्रवादीचे युवराज हिरामण काकडे यांनी ५ हजार २१२ मतांनी भाजपचे योगेश दत्तात्रय काकडे यांचा पराभव केला. युवराज काकडे यांना ९ हजार १६६, तर भाजप उमेदवाराला केवळ ३ हजार ९५४ मते मिळाली.
गण क्रमांक ८० (आव्हाळवाडी-थेऊर) मध्ये राष्ट्रवादीच्या सुषमा संतोष मुरकुटे यांनी ५ हजार ३०५ मतांच्या फरकाने विजय मिळवत भाजपच्या पूनम अशोक गायकवाड यांना पराभूत केले. मुरकुटे यांना ११ हजार २४८, तर गायकवाड यांना ५ हजार ९८७ मते मिळाली.
मोठी मतदारसंख्या, अंतर्गत राजकारण आणि स्थानिक वर्चस्वाच्या संघर्षामुळे थेऊर गट संपूर्ण हवेली तालुक्यात चर्चेचा विषय ठरला होता. थेऊर गावातून पंचायत समितीसाठी दोन उमेदवार असतानाही राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार) तिन्ही उमेदवारांनी भाजपला मोठ्या फरकाने पराभूत करत आपली संघटनात्मक ताकद दाखवून दिली.
या निकालात थेऊर जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादी काँग्रेसला एक जागा, तर पंचायत समितीत दोन जागा मिळाल्या आहेत. या विजयामुळे हवेली तालुक्यात अजित पवार गटाची राजकीय ताकद अधिक भक्कम झाली असून, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या राजकारणात थेऊर गट निर्णायक भूमिका बजावणार असल्याचा स्पष्ट राजकीय इशारा या निकालातून मिळाला आहे.