Pune: महापालिका निवडणुकीत पराभव झालेल्यांना स्वीकृत नगरसेवकपद नाही; चंद्रकांत पाटील स्पष्टच बोलले
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2026 09:33 IST2026-02-10T09:32:59+5:302026-02-10T09:33:50+5:30
स्वीकृत नगरसेवक पदासाठी उमेदवारीची संधी न मिळालेल्यांना संधी दिली जाईल, त्याचा कार्यकाळ पाच वर्षांचा नसून अडीच वर्षांचा असेल

Pune: महापालिका निवडणुकीत पराभव झालेल्यांना स्वीकृत नगरसेवकपद नाही; चंद्रकांत पाटील स्पष्टच बोलले
पुणे : ‘महापालिका निवडणुकीमध्ये संधी दिल्यानंतरही पराभव झालेल्या कोणत्याही कार्यकर्त्याला किंवा पदाधिकाऱ्याला स्वीकृत नगरसेवक म्हणून संधी दिली जाणार नाही. या पदासाठी उमेदवारीची संधी न मिळालेल्यांना संधी दिली जाईल. स्वीकृत नगरसेवकाचा कार्यकाळ पाच वर्षांचा नसून अडीच वर्षांचा असेल,’ अशी स्पष्टोक्ती राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.
पुणे महापालिकेत महापौर आणि उपमहापौर पदांची निवडणूक झाल्यानंतर पाटील यांनी नवनिर्वाचित महापौर मंजूषा नागपुरे आणि उपमहापौर परशुराम वाडेकर यांचे महापालिकेत येऊन अभिनंदन केले. यावेळी त्यांनी विविध विषयांवर माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, पश्चिम महाराष्ट्रातील जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये महायुतीला स्पष्ट बहुमत मिळेल आणि पाचही जिल्ह्यांत आमची सत्ता येईल. १२ पैकी ८ ठिकाणी महायुतीचे जिल्हा परिषद अध्यक्ष होतील. विरोधी पक्ष आता अस्तित्वात राहिला नाही. हे चिंताजनक आहे; पण सत्य परिस्थिती हीच आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गुजरातमध्ये २५ वर्षे आणि केंद्रात १५ वर्षे सातत्य ठेवले. विकासाचा हाच मॉडेल पुढे नेण्याचा आमचा प्रयत्न आहे.’ केंद्राच्या निर्णयांबाबत बोलताना त्यांनी रेशन मोफत देण्याचा उल्लेख केला. ‘रेशन अनेक ठिकाणी मोफत देतो आहोत. केंद्राचे पुढील निर्णयही जनतेला दिलासा देणारे असतील,’ असे ते म्हणाले. विरोधकांबाबत त्यांनी ‘मेहनत, तयारी आणि विश्वासार्हता नसल्यामुळे विरोधक कमी पडतात. त्यामुळे सर्वसामान्य लोकांना वाटते की भाजपच काम करत आहे,’ असे मत मांडले.
पुणे जिल्ह्यात वाढती लोकसंख्या आणि रोजगारामुळे होणारे स्थलांतर लक्षात घेता पिण्याचे पाणी, वाहतूक, रस्ते आणि पाणी अपव्यय हे प्रमुख प्रश्न असल्याचे पाटील यांनी नमूद केले. ‘अजून कुठे उड्डाणपूल करता येईल, यावर चर्चा होईल. वाहतूक समस्या मोठा प्रॉब्लेम आहे,’ असे ते म्हणाले. महापालिकेचा कारभार ‘मॉडेल’ व्हावा, तसेच शहरी गरीब योजना अधिक प्रभावीपणे राबवली जावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.