सण आले की जिभेची मजा सुरू,अन्न सुरक्षा विभागाला जाग येणार कधी ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2025 16:07 IST2025-07-20T16:07:24+5:302025-07-20T16:07:40+5:30
- आठ दिवसांवर श्रावण महिना : सणासुदीच्या पार्श्वभूमीवर खाद्यपदार्थांच्या तपासणीचा प्रश्न ऐरणीवर

सण आले की जिभेची मजा सुरू,अन्न सुरक्षा विभागाला जाग येणार कधी ?
- भरत निगडे
नीरा : आठ दिवसांनी श्रावण महिना सुरू होत आहे. या महिन्यात पोळा, जन्माष्टमी, त्यानंतर गणेशोत्सव, महालक्ष्मी, दसरा, दिवाळी अशा एकापाठोपाठ सणाचा हंगाम सुरू होतो. यादरम्यान शहरासह ग्रामीण भागातील बाजारपेठेत ठिकठिकाणी फास्टफूडचे स्टॉल उभे करण्यात येतात, तसेच स्वीट मार्टच्या दुकानांमध्ये ग्राहकांची खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात झुंबड उडते.
नेमका याचा गैरफायदा घेत अनेक व्यावसायिक खाद्यपदार्थांमध्ये भेसळ करून अन्नसुरक्षा नियमांची पायमल्ली करतात. किमान या काळात तरी अन्न व औषधी प्रशासन विभागाकडून ठोस कारवाईची अपेक्षा आहे. खाद्यपदार्थाचे नमुने संकलन आणि कारवाई याकडे प्रशासन फारसे गांभीर्याने पाहत नसल्याचे दिसून येत आहे, त्यामुळे यावर्षी तरी प्रशासन जागे होऊन कारवाई करील का? असा प्रश्न सर्वसामान्यांतून उपस्थित होत आहे. प्रशासनाकडून दुकान तपासणी होत नसल्याने काही विक्रेते कमी दर्जा, भेसळयुक्त अन्नपदार्थ विक्री करीत असल्याचे पाहावयास मिळत आहे.
खाद्यपदार्थांना मोठी मागणी
श्रावण महिन्यात उपवास व पौष्टिक खाण्यावर नागरिक भर देतात. फराळात गरमागरम साबुदाणा वडा, हलवा, खीर, खव्याचे पदार्थ, बटाटा व केळीचे वेफर्स, मिठाई, फरसाण, ड्रायफ्रूट, बेकरी उत्पादने यांची मागणी झपाट्याने वाढते, तसेच फराळासाठीचे स्टॉल्स, मिठाईच्या दुकानांमधील तयार खाद्यपदार्थ खरेदी करणाऱ्यांची संख्या मोठी असते.
फूड सेफ्टी ॲक्ट काय?
२००६ मधील अन्नसुरक्षा आणि मानक कायद्यानुसार, खाद्यपदार्थ विक्रेते, उत्पादक, रेस्टॉरंट, मिठाई विक्रेत्यांनी परवाना घेणे बंधनकारक आहे. यासोबतच अशा विक्रेत्यांना स्वच्छता, शिजवण्याची पद्धत, साठवणूक, तापमान नियंत्रण, लेबलिंग, तसेच महत्त्वाचे म्हणजे खाद्यपदार्थ खाण्यासाठीची अंतिम तारीख पॅकिंगवर स्पष्ट दिसेल, असे नमूद केले पाहिजे.
विषबाधेचा व संसर्गजन्य आजाराचा धोका
अनेक हॉटेल, रेस्टॉरंट, तसेच मिठाईच्या दुकानांतून दूषित तेल, दूषित पाणी, पॅकिंग न केलेली मिठाई, सरबत, वडे, भजी असे मुदतबाह्य अन्नपदार्थ खाल्ल्यास टायफॉइड, कॉलरा, फूड पॉयझनिंग, अतिसार, उलट्या यासारखे आजार होऊ शकतात. खीर, बर्फी, पनीर, समोसे यामधून संक्रमण होण्याची शक्यता जास्त असते.
तपासणीची स्थिती काय?
तालुक्यात अन्न व औषधी प्रशासनाकडून वर्षातून एखाद्यावेळी कुठल्या तरी आस्थापनेची तपासणी केली जाते. पुरेशा मनुष्यबळाअभावी व स्वतंत्र तपासणी यंत्रणा नसल्यामुळे फक्त निवडक नमुन्यांची तपासणी होते. सणासुदीच्या काळामध्ये नियोजनबद्ध मोहीम राबविणे गरजेचे असताना संबंधित विभाग नियमित तपासणी करण्यात अपयशी ठरत आहे.
जिल्ह्यात मोठी कारवाई कधी?...
पुणे शहर व जिल्ह्याचे कार्यक्षेत्र शंभर किलोमीटरच्या परिघातील आहे. ग्रामीण भाग हा शहरापासून लांब असल्याकारणाने जिल्ह्याच्या ठिकाणाहून तालुक्यात भेट देऊन कारवाई करणे शक्य नसल्याने आतापर्यंत तरी मोठ्या प्रमाणात कुठेही कारवाई झालेली नाही.
"सणासुदीच्या काळात हॉटेल, मिठाई दुकाने, धाबे आदी ठिकाणांची तपासणी करण्यात येणार आहे. हवाबंद खाद्यपदार्थ खरेदी करताना ग्राहकांनी माहिती नीट वाचूनच खाद्यपदार्थ खरेदी करावे. मुदतबाह्य खाद्यपदार्थ आढळल्यास खरेदी करू नये. विनापरवाना, भेसळयुक्त खाद्यपदार्थ विक्रेत्यांवर कारवाई केली जाईल." - बा. म. ठाकूर : सहायक आयुक्त अन्न व औषधी प्रशासन