Pune News : नगरसेवक पदावरून गेले, प्रशासकराज आले अन् पुणे तुंबले..!

By राजू हिंगे | Updated: June 10, 2025 09:52 IST2025-06-10T09:51:09+5:302025-06-10T09:52:19+5:30

- प्रभागातील गल्ली, बोळातील गटारी- नाल्यांत पाणी कुठे तुंबते? याची माहिती नगरसेवकांना असे त्यानुसार कामे व्हायची, प्रशासनराजमध्ये बहुतेकदा कामे केवळ कागदावरच केली जात असल्याने कुणालाच कुणाचा ताळमेळ नसल्याची टीका

pune news the corporator left office, the administrator's rule came and Pune collapsed. | Pune News : नगरसेवक पदावरून गेले, प्रशासकराज आले अन् पुणे तुंबले..!

Pune News : नगरसेवक पदावरून गेले, प्रशासकराज आले अन् पुणे तुंबले..!

पुणे : पुणे महापालिकेत गेल्या तीन वर्षांपेक्षा अधिक कालावधीपासून प्रशासकराज आहे. या कालावधीत शहरात एक ते दाेन तास धुवाधार पाऊस झाला की पुणे तुंबते. पाणी साचल्यामुळे नागरिकांचे अतोनात हाल होतात. नगरसेवकांना प्रभागातील गल्ली, बोळातील गटारी, नाले यांचे पाणी कुठे तुंबते, याची माहिती होती. त्यानुसार ते काम करून घेत होते. मात्र कनिष्ठ अभियंत्यांना प्रभागाची तेवढी सखोल माहिती नाही. त्यात कामे केवळ कागदावरच केली जात आहेत. त्यामुळे नगरसेवक पदावरून गेले आणि प्रशासकराज आले. त्यामुळे पुणे तुंबत असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. पुणे महापालिकेच्या सभागृहाची मुदत १४ मार्च २०२२ रोजी संपली. त्यानंतर पालिकेची निवडणूक झाली नाही. 

त्यामुळे पुणे महापालिकेमध्ये प्रशासकराज सुरू झाले. पालिका आयुक्तच प्रशासक म्हणून काम पाहू लागले. पालिकेचे सभागृह अस्तित्वात असताना म्हणजे नगरसेवक असतानाही जेवढ्या प्रमाणात पाऊस पडत होता, तेवढाच पाऊस आताही पडत आहे. पण, आता पुणे जेवढे तुबंते तेवढे नगरसेवक असताना तुंबत नव्हते. नगरसेवकांना प्रभागाची भौगौलिकदृष्ट्या सर्व माहिती असते.

काही जण दोन ते पाच टर्म नगरसेवक राहिले आहेत. त्यामुळे प्रभागात मुसळधार पाऊस किंवा पूर आल्यानंतर कुठल्या भागात घरांमध्ये पाणी शिरते, कुठल्या भागात पाणी साचते, कुठे सीमाभिंत धोकादायक आहे, नालेसफाई, पावसाळी गटारी कुठे आहेत, त्यांची सद्यस्थिती काय आहे, याची खडानखडा माहिती नगरसेवकांना होती. पण, याउलट महापालिकेच्या कनिष्ठ अभियंत्यांना प्रभागांमध्ये पावसाळी लाईनचे चेंबर, कुठे पाणी साचते, त्याची बारीकसारीक माहिती नसते. नगरसेवकांचे पावसाळीपूर्व कामांवर लक्ष होते आणि ठेकेदारांवर अंकुश होता. नगरसेवक संबंधित ठेकेदारांकडून कामे करून घेत होते.

नाले, पावसाळी गटारीची साफसफाई क्षेत्रीय ऐवजी आता मुख्य खात्यामार्फत

नाले, पावसाळी गटारीची साफसफाई कामे ही पूर्वी क्षेत्रीय कार्यालय स्तरावर केली जात होती, परंतु गेल्या तीन वर्षांपासून ही कामे मुख्य खात्यामार्फत केली जातात. त्यामुळे मुख्य खात्याच्या अधिकाऱ्यांसह कनिष्ठ अभियंत्यांना प्रभागातील पावसाळी गटारी ट्रेन लाईन आणि नाले यांची सखोल माहिती नसते. शहरातील नाले आणि पावसाळी गटारीची केवळ दर्शनी भागात साफसफाई केली जाते. त्यामुळे पावसाळ्यात पाणी तुंबून नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागते. 

अनेक कामे केवळ कागदावरच

नगरसेवकांना प्रभागात ड्रेनेज लाईन कुठे बदलण्याची गरज आहे, नाले कुठे तुबंतात, याची माहिती असते. त्यामुळे पालिकेच्या अंदाजपत्रकात ‘स’ यादीद्वारे नगरसेवक तरतूद करून कामे करत होते. पण, आता पालिकेचे अधिकारी आणि ठेकेदार यांची मिलीभगत असून, अनेक कामे केवळ कागदावरच होत आहेत. अनेक ठिकाणी बांधकामासाठी नाले वळविले जात आहेत, असा आरोप काँग्रेसचे माजी गटनेते अरविंद शिंदे यांनी केला.

कनिष्ठ अभियंत्यांना प्रभागाचे ज्ञान नाही !

कनिष्ठ अभियंत्यांना प्रभागामध्ये किती पावसाळी चेंबर आहेत याचेही ज्ञान नाही. कनिष्ठ अभियंते हे माजी नगरसेवकांनाही विश्वासात घेत नाहीत. त्यामुळे नाले आणि पावसाळी गटारीची साफसफाई व्यवस्थित होत नाही, असे भाजपचे माजी नगरसेवक बाळा ओसवाल यांनी सांगितले.  

पावसाळी गटारी, नालेसफाई कामे क्षेत्रीय कार्यालय स्तरावर करावीत

प्रभागांमध्ये पाणी तुंबत असल्याच्या तक्रारी घेऊन नागरिक नगरसेवकांकडे येत होते. त्यानुसार नगरसेवक प्रभागामध्ये काम करत होते. पावसाळी गटारी आणि नालेसफाईची कामे क्षेत्रीय कार्यालय स्तरावर केली पाहिजे. किमान ५० लाखांपर्यंतचे काम करण्याचे अधिकार क्षेत्रीय कार्यालयांना द्यावे, असे शिंदे सेनेचे माजी नगरसेवक प्रमोद नाना भानगरे यांनी सांगितले.

महापालिकेच्या दोन विभागामध्ये समन्वय नाही

कोंढवा येथे पुणे महापालिकेच्या ड्रेनेज विभागाने ड्रेनेजच्या चेंबरचे काम केले होते. पण, पालिकेच्या पथ विभागाने हे चेंबर तोडून त्यामध्ये माती भरली होती. त्यामुळे दोन्ही बाजूच्या एक किलोमीटर लांबीच्या ड्रेनेजच्या लाईन चोकअप झाल्या होत्या. त्यामुळे ड्रेनेजलाईन तुंबत होती. याप्रमाणे अनेक घटना घडत आहेत. पुणे महापालिकेच्या दोन विभागांमध्ये समन्वय नाही. त्यामुळे पाणी तुंबण्याचे प्रमाण वाढले आहे, असे मनसेचे माजी नगरसेवक साईनाथ बाबर यांनी सांगितले.

निविदामध्ये रिंग, पालिका अधिकारी चालवितात की ठेकेदार !

पावसाळीपूर्व कामांच्या झोननुसार निविदा काढल्या जातात. त्यामुळे एका झोनमध्ये चार क्षेत्रीय कार्यालये आहेत. संबंधित ठेकेदाराला पाणी तुंबल्यावर फोन केला, तर मी तिकडे आहे, असे उत्तर दिले जाते. गेल्या अनेक वर्षांपासून प्रभागांमध्ये तेच ठेकेदार काम करत आहेत. त्यामुळे निविदामध्ये रिंग होत आहे, त्याचा परिणाम कामावरती होत आहे. पालिका अधिकारी चालवतात की ठेकेदार असा प्रश्न पडत आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माजी स्थायी समितीचे अध्यक्ष विशाल तांबे यांनी सांगितले.

प्रशासन काळामध्ये कोणाचा कोणालाही ताळमेळ नाही

नगरसेवक असताना प्रभागातील कामांवर लक्ष असायचे. ठेकेदार आणि अधिकाऱ्यांवर नगरसेवकांचा अंकुश होता. पण, आता प्रशासक काळामध्ये कोणाचा कोणालाही ताळमेळ नाही. पावसाळीपूर्व कामे काही भागात पूर्ण होतच नाहीत, असे शिवसेना (उद्धव ठाकरे गट) माजी गटनेते पृथ्वीराज सुतार यांनी सांगितले.

नागरिकांच्या तक्रारीला प्रशासन दाखविते केराची टोपली

पुणे महापालिकेचा आपत्ती व्यवस्थापन विभाग पूर्ण क्षमतेने कार्यरत नाही. नागरिक अधिकाऱ्याकडे तक्रारी घेऊन गेल्यानंतर त्याला केराची टोपली दाखविली जाते. पावसाळीपूर्व कामे करताना चेंबरमधील गाळ काढून तो बाजूला ठेवला जातो. पाऊस पडल्यावर तो गाळ पुन्हा चेंबरमध्ये जातो. त्यामुळे या प्रकारच्या साफसफाईला काही अर्थ राहत नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे माजी सभागृह नेते सुभाष जगताप यांनी सांगितले.

Web Title: pune news the corporator left office, the administrator's rule came and Pune collapsed.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.