स्मार्ट मीटरधारक थकबाकीदारांची आता स्वयंचलित वीजतोडणी
By नितीन चौधरी | Updated: February 25, 2026 07:25 IST2026-02-25T07:22:30+5:302026-02-25T07:25:02+5:30
- १८ फेब्रुवारीपासून राज्यात अमंलबजावणी सुरू, आतापर्यंत हजारो ग्राहकांची तोडली वीज, ग्राहकांना कल्पना न देता अमंलबजावणी केल्याने संघटनांची टीका

स्मार्ट मीटरधारक थकबाकीदारांची आता स्वयंचलित वीजतोडणी
पुणे : राज्यात स्मार्ट अर्थात टीओडी मीटर बसविलेल्या लाखो ग्राहकांची वीजबिलाची थकबाकी ४५ दिवसांपेक्षा जास्त झाली असल्यास त्यांचा वीजजोड आपोआपच तोडण्यास सुरुवात झाली आहे. स्मार्ट मीटरमधील या सुविधेचा प्रारंभ १८ फेब्रुवारीपासून राज्यभरात सुरू झाला आहे. वीजबिलाची थकबाकी भरल्यानंतर वीजजोड आपोआपच सुरू होणार आहे.
राज्यभरात किती ग्राहकांचे वीजजोड गेल्या पाच दिवसात तोडण्यात आले, याची माहिती देण्यास टाळाटाळ करण्यात येत असली तरी पुणे परिमंडळात अशा ८ हजार थकबाकीदार ग्राहकांचे वीजजोड तोडण्यात आले आहेत. दरम्यान, महावितरणकडून सवलत किती मिळाली, याचा गाजावाजा केला जातो. मात्र, ग्राहकांशी थेट संबंधित असलेल्या सुविधेबाबत कल्पना दिली जात नाही, असा आरोप सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी केला आहे.
गेल्या दोन वर्षांपासून राज्यभरात महावितरणकडून स्मार्ट अर्थात टीओडी मीटर बसविले जात आहेत. हे मीटर बसविलेल्या घरगुती वीज ग्राहकांना दिवसाच्या वीज वापराबद्दल प्रतियुनिट ८० पैसे सवलत देण्यात येत आहे. राज्यभरात आतापर्यंत ८७ लाख ५७ हजार स्मार्ट मीटर बसविण्यात आले आहेत. स्मार्ट मीटर बसविण्यात महाराष्ट्राचा देशात पहिला क्रमांक आहे. या एकूण मीटर संख्येमध्ये ५४ लाख ४२ हजार ग्राहक घरगुती आहेत. पुणे परिमंडळात ही संख्या ९ लाख ८४ हजार इतकी असून, एकूण वीज ग्राहकसंख्येच्या हे प्रमाण २५ टक्के इतके आहे.
ग्राहकाला वीजबिल दिल्यानंतर ते भरण्यासाठी २१ दिवसांचा कालावधी दिला जातो. त्यानंतर पंधरा दिवसांची नोटीस दिल्यानंतर बिल न भरल्यास त्याचे वीजजोड तोडले जाते. त्यासाठी महावितरणचे कर्मचारी प्रत्यक्ष फिल्डवर जाऊन संबंधित ग्राहकाची तोडणी करतात. यासाठी शेजारील ग्राहकांची वीज बंद करावी लागते. यात मनुष्यबळ आणि वेळेचा अपव्यय होतो.
जे ग्राहक जाणीवपूर्वक थकबाकी भरत नसतील अशांसाठी ही सुविधा योग्य आहे. मात्र, सर्वच ग्राहकांकडून सहकार्य हवे असल्यास त्यांना आधी या सुविधेबाबत सावध करणे गरजेचे आहे. त्यानंतरच महावितरणने अशी कारवाई करावी. - विवेक वेलणकर, अध्यक्ष, सजग नागरिक मंच, पुणे