मार्केटयार्ड फळबाजारात नागपूर संत्र्याची आवक सुरू
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2025 14:51 IST2025-10-29T14:50:19+5:302025-10-29T14:51:29+5:30
- सततच्या पावसामुळे फळबागांना फटका तर नागपूर संत्र्याचे ५० टक्के नुकसान

मार्केटयार्ड फळबाजारात नागपूर संत्र्याची आवक सुरू
पुणे : यंदाचा लांबलेला मॉन्सून आणि परतीच्या पावसाचा वाढलेला मुक्काम यामुळे विविध फळबागांना फटका बसला आहे. यामध्ये नागपूर संत्र्याचा हंगामाला फटका बसला असून, सततच्या पावसाने संत्र्यांची फळगळ आणि माशीच्या प्रादुर्भावामुळे ५० टक्क्यांपर्यंत नुकसान झाल्याचे समोर आले आहे.
परिणामी बाजारातील आवक आणि हंगाम देखील लवकर उरकरण्याची भिती व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे. पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती मार्केटयार्ड येथील फळ बाजारात सध्या ७०० पेट्यांची आवक होत आहे. यावेळी ८ डझन ते २० डझनच्या पेटीला सुमारे ३०० ते ११०० रूपये दर असल्याची माहिती नागपूर संत्र्यांचे प्रमुख आडतदार करण जाधव यांनी दिली.
यंदा संत्रा फळाचा हंगाम अडचणीत
माशीच्या प्रादुर्भावामुळे संत्र्यांचा दर्जा आणि टिकवण क्षमता कमी झाली असून, संत्र्याला दोन दिवसांतच पाणी सुटायला लागले आहे. यामुळे तातडीने माल विक्री करावी लागत आहे. तर पाणी सुटत असल्याने खरेदीदार पण कमी खरेदी करत आहे. तसेच सततच्या पावसाने आणि फळांना ऊन न मिळाल्यामुळे फळांमध्ये रंग आणि गोडी उतरली नसल्याने आंबटपणा वाढला आहे. त्यामुळे यंदा संत्री फळाला पावसामुळे चांगलाच फटका बसला आहे. त्यामुळे शेतकरी व व्यापारी अडचणीत आले आहेत.
- असे आहेत दर
डझन आणि दर (रुपये)
९ ते १० --- ११००
८ ते ११ - १०००
१२ डझन ८००
१४ डझन ७००
२०० नग - ५०० रूपये
३०० नग ३०० रूपये.
‘या आठवड्यापासून नागपूर संत्र्यांच्या आवकेला प्रारंभ झाला. मात्र सततच्या पावसाने फळांची गळ होत असून, माशीचा देखील प्रादुर्भाव झाल्याने हंगाम अडचणीत आला आहे. यामुळे आवक कमी येत असून, तीन महिने चालणारा हंगाम दीड महिन्यातच संपण्याची भीती आहे. - करण जाधव, संत्री व्यापारी