- हिरा सरवदेपुणे : मुळा आणि मुठा नद्यांमधील प्रदूषण कमी करण्यासाठी जायका प्रकल्पासाठी भाजपच्या मंत्र्यांचे सत्कार झाले, मात्र गेल्या नऊ वर्षांत या प्रकल्पाचे काम अजून निम्मेसुद्धा झालेले नाही, अशी टीका काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार मोहन जोशी यांनी केली.
मुठा आणि मुळा नद्यांमधील सांडपाण्यावर प्रक्रिया करून पाण्याचा फेरवापर शेतीसाठी करावयाचा, असा हा प्रकल्प राष्ट्रीय नदी संवर्धन योजनेअंतर्गत राबविला जात आहे. केंद्र सरकारमध्ये प्रकाश जावडेकर पर्यावरण राज्यमंत्री असताना तो प्रकल्प मंजूर झाला. या निमित्ताने बालगंधर्व रंगमंदिरात जावडेकर यांचा नागरी सत्कार करण्यात आला. भाजपने गाजावाजा, प्रसिद्धी खूप केली. निवडणूक प्रचारात आश्वासने दिली. २०१६ साली कामाला सुरुवात झाली.
३१ मार्च २०२५ पर्यंत मुदत देण्यात आली होती. काम सुरू होऊन ९ वर्षे लोटली. मुदतीत ५० टक्क्यांहूनही अधिक काम पूर्ण झालेले नाही. त्यामुळे पालिका प्रशासन मुदतवाढ मागत आहे. तसेच मध्यंतरी जादा पाणी वापराबद्दल राज्य सरकारने महापालिकेला भुर्दंड ठोठावला. त्याही वेळी सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यास महापालिका अपयशी होत असल्याचा ठपका महायुतीच्या सरकारने ठेवला होता. याप्रकरणी एकंदरच टोलवाटोलवी आणि भाजपचा नाकर्तेपणा दिसून येत असल्याची टीका जोशी यांनी केली आहे.