कडबनवाडीतील चिंकारा वनक्षेत्रात आगीचा विळखा; शेकडो हेक्टर वनक्षेत्र जळून खाक
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2026 13:23 IST2026-04-11T13:22:39+5:302026-04-11T13:23:13+5:30
- पशु, प्राण्यांना आगीची झळ हरीण, लांडगे यांसह प्राणी, पक्ष्यांचे नुकसान, आगीचे कारण अस्पष्ट

कडबनवाडीतील चिंकारा वनक्षेत्रात आगीचा विळखा; शेकडो हेक्टर वनक्षेत्र जळून खाक
- किरण माने
शेळगाव : चिंकारा अभयारण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या इंदापूर तालुक्यातील कडबनवाडी, रुई हद्दीमधील वनक्षेत्राला गुरुवारी (दि. ९) दुपारी तीनच्या सुमारास आग लागली. यामध्ये सुमारे शंभर हेक्टर वनक्षेत्र खाक झाल्याची माहिती समोर आली आहे. या वनक्षेत्राला आग लावली की लागली, हा प्रश्न आता निर्माण झाला आहे. आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. आगीचा तांडव अत्यंत मोठा असल्याने त्या ठिकाणी असणाऱ्या हरीण, लांडगे यांसह इतर प्राण्यांचे आणि पशुंचे मोठे नुकसान झाले आहे.
या आगीमुळे पक्ष्यांना आणि लहान प्राण्यांना आपली घरटी, निवारा गमवावा लागला आहे. या आगीमध्ये सरपटणारे प्राणी, टिटव्ह्यांची पिल्ले यांची मोठी जीवितहानी झाली असल्याची देखील प्राथमिक माहिती मिळत आहे. कडक उन्हाळ्याच्या दिवसांमुळे वनक्षेत्रामध्ये गवत पूर्णपणे सुकून गेले होते. त्यात अज्ञात कारणाने आग लागली.
वाऱ्याचा प्रचंड वेग यामुळे आग जास्त प्रमाणात पेटली. आगीची माहिती मिळाल्यानंतर पर्यावरण प्रेमी भजनदास पवार तसेच वनरक्षक, कडबनवाडी, रुई परिसरातील ग्रामस्थ आणि शेजारील शेतकऱ्यांनी धाव घेतली, तसेच आग विझवण्यासाठी प्रयत्न केले. दरम्यान, या घटनेची माहिती मिळाल्यानंतर शुक्रवारी (दि. १०)सहायक वनसंरक्षक अतुल जैन यांनी पाहणी केली. भविष्यात असे प्रसंग घडू नयेत यासाठी उपाययोजना कराव्यात अशा सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
३५०० हेक्टर वनक्षेत्र
कडबनवाडीचे वनक्षेत्र सुमारे ३५०० हेक्टर आहे. या वनक्षेत्रामध्ये प्रामुख्याने चिंकारा, तरस, ससा, कोल्हे, लांडगे, खोकड असे प्राणी, तसेच गरुड, सर्पमार गरुड, धावक, मळटिटवी, चंडोल, श्रृंगारी घुबड अशा विविध प्रजातीचे पक्षी आणि सरपटणारे प्राणी इथे आढळतात.
वनक्षेत्रामध्ये कडबनवाडी घडलेली आगीची घटना दुःखद आहे.यापूर्वी देखील आगीच्या घटना घडल्यामुळे भविष्यातील वनक्षेत्रामध्ये आगीचा धोका टाळण्यासाठी अग्निशामक वाहनाची आवश्यकता आहे. - दादासो जाधव, सरपंच कडबनवाडी
अंदाजे १०० हेक्टर क्षेत्रात आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे.आगीमध्ये अनेक सूक्ष्मजीवांना जीव गमवावा लागला, यातून फार मोठे नुकसान झाले. हरिण आणि पक्षी सैरावैरा पळत होते ते पाहून मनाला दुःख झाले. टिटव्ह्यांच्या पिल्लांना फार मोठा धोका झाला, त्यांच्या आवाजामुळे मनाला मोठे दुःख झाले. - भजनदास पवार, पर्यावरण प्रेमी