अखेर १० विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा मार्ग मोकळा, गुंजवणी धरणात सुरू झाली बोट
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2025 13:44 IST2025-07-24T13:43:55+5:302025-07-24T13:44:25+5:30
- शाळा सुरू झाल्यापासून विद्यार्थी जात नव्हते शाळेत, स्थानिकांनी निवेदन देऊनही घेतली जात नव्हती दखल

अखेर १० विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा मार्ग मोकळा, गुंजवणी धरणात सुरू झाली बोट
वेल्हे : राजगड तालुक्यातील गुंजवणी धरणात बोट सुरू झाल्याने गेवंडे परिसरातील १० विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला असून, त्यांचे शिक्षण घेता येणार असल्याने सरपंच सुनिता खुटेकर यांनी ‘दैनिक लोकमत’चे आभार मानले आहेत. ‘गुंजवणी धरणात बोट सुरू नसल्याने दहा विद्यार्थी शिक्षणापासून वंचित’ या मथळ्याखाली दिनांक १८ जुलै रोजी बातमी प्रसिद्ध झाली होती. याच बातमीची दखल घेत जलसंपदा विभागाने बोट सुरू केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, निरा देवधर प्रकल्प विभागाच्या कार्यकारी अभियंत्याना वारंवार पत्रव्यवहार करूनदेखील जलसंपदा विभाग बोट सुरू करण्यासाठी कानाडोळा करीत होते गुंजवणी धरणाग्रस्तांनी गेवंडे, गेळगणी, खुटेकर वस्ती, धनगर वस्ती येथील रस्त्यासाठी आपल्या जमिनी मोबदला मिळण्याच्या अगोदर दिल्या आहेत, कारण सर्व गावांत रस्ता व्यवस्थित जाईल, या गावांना रस्त्यासाठी १२ कोटी निधी उपलब्ध झाला असून, या रस्त्याचे टेंडर झाले असून, चार महिन्यांपूर्वी रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली. पण, रस्ता पूर्ण झाला नाही.
गेवंडे, गेळगणी, खुटेकर वस्ती, धनगर वस्ती येथील विद्यार्थी निवी येथील माध्यमिक विद्यालय व येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत १० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. येथील विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी रस्ता नसल्याने गुंजवणी धरणातील बोटीचा आधार घ्यावा लागतो. दरवर्षी बोट सुरू होती, परंतु या वर्षी बोट सुरू नसल्याने अगदी पहिल्या दिवसापासून म्हणजे १६ जूनपासून विद्यार्थी शाळेत जात नव्हते. त्यामुळे येथील विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान झाले असून, रस्त्याचे काम पूर्ण होईपर्यंत संबंधित ठेकेदाराने बोट चालवून गावातील प्रवाशांची सोय करावी, अशी अट टेंडरमध्ये असूनदेखील संबंधित ठेकेदार बोट चालवित नव्हता. गेवंडे, गेळगणी, खुटेकर वस्ती, धनगर वस्ती येथील नागरिकांना देखील दळणवळणासाठी कोणताही मार्ग उपलब्ध नसल्याने नागरिकांची देखील मोठ्या प्रमाणात गैरसोय होत होती.
कानंद गेवंडे, घिसर काठ रस्ता जोपर्यंत पूर्ण होत नाही, तोपर्यंत संबंधित ठेकेदाराने यांत्रिकी बोटद्वारे शालेय विद्यार्थी व प्रकल्पग्रस्तांची वाहतूक करणे बंधनकारक आहे, असे निविदा प्रक्रियामध्ये स्पष्ट असताना देखील संबंधित ठेकेदाराने यांत्रिकी बोट सुरू केली नाही. तरी, विद्यार्थी आणि प्रकल्पग्रस्तांसाठी ताबडतोब ती बोट सुरू करावी, अशी मागणी सरपंच सुनिता खुटेकर यांनी केली होती. तरीदेखील जलसंपदा विभागाने याकडे काणाडोळा केला होता. परंतु, ‘दैनिक लोकमत’मध्ये गुंजवणी धरणात बोट सुरू नसल्याने दहा विद्यार्थी शिक्षणापासून वंचित या मथळ्याखाली बातमी लागल्यानंतर जलसंपदा विभाग जागा झाला व ताबडतोब बोट सुरू केली.
कानंद गेवंडे, घिसर येथील १० विद्यार्थी शिक्षणासाठी व शेतकऱ्यांना दूध संकलन करण्यासाठी आणि आरोग्य सेवा सुरू करण्यासाठी ‘दैनिक लोकमत’ने आवाज उठवला. म्हणून, बोट सुरू झाली त्याबद्दल ‘दैनिक लोकमत’चे मनापासून आभार. - विकास कडू, माजी सरपंच, निवी गेवंडे ग्रामपंचायत