दौंड : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने मोठी कारवाई करत दौंड येथे गोवा राज्यातून बेकायदेशीरपणे वाहतूक होत असलेला दारूचा साठा जप्त केला आहे. या कारवाईत तब्बल दीड कोटी रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून, युसुफ शेख या आरोपीला अटक करण्यात आली आहे, अशी माहिती दौंड उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक विजय रोकडे आणि दुय्यम निरीक्षक प्रदीप झुंजरुक यांनी दिली.
महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक आणि दौंड उत्पादन शुल्क विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ही कारवाई आज दुपारी करण्यात आली. गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे दौंड येथील रेल्वे उड्डाणपुलाजवळ सापळा रचण्यात आला. गोवा राज्यातील बनावट गोवा ब्रँडची विदेशी दारू सहा चाकी लेलँड कंपनीच्या ट्रकमधून (क्र. एम.एच. १८ बी. जी. २३०४) वाहतूक केली जात असल्याचे निदर्शनास आले.
छापा टाकून संबंधित ट्रकची झडती घेतली असता, त्यामध्ये ११ हजार दारूचे बॉक्स आढळून आले. दारूचा साठा व ट्रक असा एकूण दीड कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क आयुक्त डॉ. राजेश देशमुख यांच्या आदेशानुसार, सहआयुक्त प्रसाद सुर्वे, उपअधीक्षक रवींद्र उगले, रियाज खान आणि विजयकुमार थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत दुय्यम निरीक्षक एस. आर. गायकवाड , एस. एस. गोंदकर, बाबू देवकर, अमोल चौगुले, महेश कोकणे, चंदन पंडित तसेच दौंड विभागाचे निरीक्षक विजय रोकडे व दुय्यम निरीक्षक प्रदीप झुंजरुक सहभागी होते.
या प्रकरणात मोठ्या प्रमाणात परराज्यातील मद्यसाठा जप्त करण्यात आल्याने महाराष्ट्र शासनाचा महसूल बुडविण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. या गुन्ह्यात आंतरराज्यीय टोळी कार्यरत असल्याची शक्यता असून, संबंधित इतर आरोपींचा तपास सुरू असल्याचे राज्य उत्पादन शुल्क विभागाने सांगितले आहे.
Web Summary : Authorities in Daund seized illegal Goan liquor worth ₹1.5 crore, arresting Yusuf Sheikh. The operation, a joint effort, intercepted a truck carrying 11,000 boxes of liquor near a railway flyover, preventing significant revenue loss for the state.
Web Summary : दौंड में अधिकारियों ने डेढ़ करोड़ की अवैध गोवानी शराब जब्त की, युसूफ शेख गिरफ्तार। एक संयुक्त अभियान में, एक ट्रक को 11,000 शराब के बक्सों के साथ रेलवे फ्लाईओवर के पास रोका गया, जिससे राज्य को राजस्व का भारी नुकसान होने से बचाया गया।