बहुजन समाजाला पुढे घेऊन जाण्यासाठी पुनीत बालनसारख्या दानशुरांची गरज - शाहू महाराज
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2024 22:19 IST2024-01-12T22:18:54+5:302024-01-12T22:19:34+5:30
श्री शिवाजी मराठा सोसायटीच्या शिवाजीनगरमधील छत्रपती ताराबाई वसतिगृहाचे भूमिपूजन आणि कोनशिलेचे अनावरण श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांच्या हस्ते झाले.

बहुजन समाजाला पुढे घेऊन जाण्यासाठी पुनीत बालनसारख्या दानशुरांची गरज - शाहू महाराज
पुणे : बहुजन समाज एकत्र येऊन काम करत राहिल्यास सर्वांना सोबत घेऊन जाण्याची क्षमता समाजात आहे. त्यासाठी युवा उद्योजक पुनीत बालन यांसारख्या दानशूर व्यक्तींच्या सहकार्याची आवश्यकता असून त्यांच्या मदतीचे आपण चीज केले पाहिजे असे प्रतिपादन कोल्हापूरचे श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांनी केले.
श्री शिवाजी मराठा सोसायटीच्या शिवाजीनगरमधील छत्रपती ताराबाई वसतिगृहाचे भूमिपूजन आणि कोनशिलेचे अनावरण श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांच्या हस्ते झाले. यावेळी पुनीत बालन ग्रुपचे अध्यक्ष पुनीत बालन, माणिकचंद ऑक्सिरीच व आरएमडी फाउंडेशनच्या अध्यक्षा जान्हवी धारीवाल-बालन यांची प्रमुख उपस्थिती होती. माजी आमदार उल्हास पवार, काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, शिवसेना ठाकरे गटाचे शहर प्रमुख संजय मोरे, प्रमिला गायकवाड, संस्थेचे उपाध्यक्ष राजेंद्र जगताप, मानद सचिव अण्णा थोरात, सहसचिव विकास गोगावले, खजिनदार जगदीश जेधे, सत्येंद्र कांचन, विलास गव्हाणे यावेळी उपस्थित होते.
छत्रपती शाहू महाराज म्हणाले, राजमाता जिजाऊ यांच्या जन्मदिनी त्यांच्या स्नुषा ताराबाई यांच्या नावाने वसतिगृहाची पायाभरणी झाली आहे. ही चांगली गोष्ट आहे. शिक्षण हे एक असे क्षेत्र आहे की ज्यामध्ये जितके काम करू तितके कमीच आहे. इतर शैक्षणिक संस्थेच्या बरोबरीने किंवा पुढे जायचे असेल तर सामाजिक आणि वैचारिक लोकांनी यामध्ये अधिक लक्ष घालून जोमाने काम पुढे न्यायला हवे, असेही त्यांनी सांगितले.
पुनीत बालन म्हणाले, पुनीत बालन ग्रुपच्या माध्यमातून नेहमीच गरजू लोकांना मदत मिळवून देण्याचा प्रयत्न असतो. छत्रपती ताराबाई वसतिगृहाच्या माध्यमातून शिक्षण घेण्यासाठी अधिकाधिक विद्यार्थ्यांना फायदा होईल, तसेच या इमारतींना रसिकलाल माणिकचंद धारीवाल व इंद्राणी बालन अशी नावे देण्याचा जो निर्णय संस्थेने घेतला याबद्दल त्यांनी आभार व्यक्त केले. अण्णा थोरात यांनी प्रास्ताविक केले. अमित गोगावले यांनी सूत्रसंचालन केले.