पेशवाईतील सरदार अंबाजीपंत पुरंदरे वाडा
By Admin | Published: May 11, 2017 04:05 AM2017-05-11T04:05:10+5:302017-05-11T04:05:10+5:30
सासवडचा कऱ्हाकाठ खूप महत्त्वपूर्ण आहे. येथील सासवडनगरीतील जुन्या एका वाड्याला तेवढीच ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे.
![Peshwaja Sardar Anbha Panth Purandare Wada | पेशवाईतील सरदार अंबाजीपंत पुरंदरे वाडा Peshwaja Sardar Anbha Panth Purandare Wada | पेशवाईतील सरदार अंबाजीपंत पुरंदरे वाडा](https://d3pc1xvrcw35tl.cloudfront.net/images/840x630/default-image_201704447.jpg)
पेशवाईतील सरदार अंबाजीपंत पुरंदरे वाडा
गणेश मुळीक ।
लोकमत न्यूज नेटवर्क
सासवड : सासवडचा कऱ्हाकाठ खूप महत्त्वपूर्ण आहे. येथील सासवडनगरीतील जुन्या एका वाड्याला तेवढीच ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. पुण्याचा शनिवारवाड्याअगोदर २० वर्षे बांधलेला येथील ‘आबासाहेब पुरंदरे वाडा’ म्हणजे या नगरीचे चिरेबंदी सौंदर्यच आहे!
या वाड्याचे पुढे खिंडार पडले व थोडी पडझड झाली, तरी काही भाग सुस्थितीत आहे. तटबंदी मजबूत आहे. त्यामुळे आताचे मालक जय पुरंदरे करू इच्छित असलेले ऐतिहसिक संग्रहालय या वाड्यात साकारले, तर पुन्हा या वैभवला झळाळी मिळेल.
कऱ्हाकाठावरील पुरंदरे घराण्याचे संस्थापक व पेशव्यांचे दिवाण अंबाजीपंत पुरंदरे यांनी १७१०मध्ये हा पुरंदरे वाडा बांधला. ते साताऱ्याचे शाहू महाराज यांचे मुतालिकही होते. छत्रपती शिवाजीमहाराजांच्या काळात कुलकर्णी वतनदार म्हणून त्रिंबक पुरंदरे होते. शाहूंना गादीवर बसविण्यात या अंबाजीपंत पुरंदरे यांनी बाळाजी विश्वनाथ भट (पेशवे) यांच्यासह आघाडी घेतली होती. हा पुरंदरे वाडा चार एकर क्षेत्रावर सातचौकी पद्धतीने बांधलेला आहे. चाळीस हजार चौरस फुटांचे बांधकाम यात आहे. ३०० वर्षांपूर्वी कऱ्हाकाठाची खडकाळ जागा खास निवडून हा चिरेबंद तटबंदीचा व आत चारमजली असलेला वाडा बांधला.
पुरंदरे यांचे पूर्वज पूर्वी हत्तीवरून अंबारीतून यायचे; त्यामुळे बाहेरचा मुख्य दरवाजा अंबारीसह हत्ती आत येईल एवढा होता. एखाद्या किल्ल्याचे वा गढीचे प्रवेशद्वार वाटावे, असे या वाड्याचे आतील मुख्य प्रवेशद्वार आहे. त्याला बुरूज, दगडात कोरलेल्या निरक्षण खाचा, लाकडी दारावर लोखंडी संरक्षक भलेमोठे खिळे, दगड, लाकूड, लोखंड, शिसे यांचे जोड प्रत्येक ठिकाणी आजही मजबूत आहेत. जेवढे बांधकाम वर दिसते तेवढीच जागा तळघरांनी व्यापली आहे. आड, विहीर, भुयारे, टेहळणी मनोरे चार दिशांना चार आहेत. फक्त भुयारे कुठपर्यंत जातात, याची खात्री झाली नाही. तीनशे वर्षांपूर्वीची रंगीत भित्तिचित्रे आजही आहेत, असे जय पुरंदरे यांनी सांगितले.