नको सीईओ आणि नको आरक्षण, भाऊ आपली ग्रामपंचायतच बरी; नीरा ग्रामस्थांनी नगरपंचायतीचा प्रस्ताव फेटाळला
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2025 12:35 IST2025-06-10T12:34:35+5:302025-06-10T12:35:25+5:30
नीरा ग्रामपंचायत हद्दीत असणाऱ्या मतदारांची संख्या आता १५ हजारांवर झालेली आहे. तर, नीरा येथे राहणाऱ्या लोकांची संख्या जवळपास ३० हजार झाली आहे.

नको सीईओ आणि नको आरक्षण, भाऊ आपली ग्रामपंचायतच बरी; नीरा ग्रामस्थांनी नगरपंचायतीचा प्रस्ताव फेटाळला
नीरा : पुरंदर तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या नीरा ग्रामपंचायतीचे रूपांतर नगरपंचायतीमध्ये करावे, अशी मागणी नीरा येथील अनेक ग्रामस्थांनी केली होती. यासंदर्भात सोमवारी नीरा ग्रामपंचायतीने ग्रामसभेचे आयोजन केले होते. यामध्ये वाॅर्ड नंबर पाचमधील ग्रामस्थांनी नगरपंचायतीचा ठराव फेटाळून लावला आहे. ‘नको सीईओ आणि नको आरक्षण, भाऊ आपली ग्रामपंचायतच बरी’, अशी प्रतिक्रिया येथील ग्रामस्थांनी दिली आहे. त्यामुळे नीरा नगरपंचायत होण्याची प्रक्रिया सध्या तरी लांबणीवर पडली आहे.
नीरा ग्रामपंचायत हद्दीत असणाऱ्या मतदारांची संख्या आता १५ हजारांवर झालेली आहे. तर, नीरा येथे राहणाऱ्या लोकांची संख्या जवळपास ३० हजार झाली आहे. यामुळे नीरा ग्रामपंचायत लोकांना सेवा सुविधा देत असताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्याच पार्श्वभूमीवर नीरा ग्रामपंचायतीची नगरपंचायत करावी आणि नीरा शहराचा नियोजित विकास केला जावा. नीरा शहराचा विकास आराखडा तयार केला जावा, अशी मागणी नीरा येथील ग्रामस्थांनी केली होती. विशेषतः नीरा ग्रामपंचायतीचे सदस्य प्रमोद काकडे, अनिल चव्हाण आणि सामाजिक कार्यकर्ते सचिन मोरे, अमोल साबळे, टी. के. जगताप, भारतीय जनता पक्षाचे विस्तारक योगेंद्र माने, शिवसेनेचे दयानंद चव्हाण यांनी ही मागणी लावून धरली होती.
यासंदर्भात शासकीय पातळीवर पत्रव्यवहार देखील करण्यात आला होता. पुरंदरचे आमदार विजय शिवतारे, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील या प्रकरणांमध्ये लक्ष घातले आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाच्या वतीने नीरा येथील ग्रामस्थांचे नगरपंचायत करण्यासंदर्भात काय मत आहे? हे जाणून घेण्यासाठी नीरा ग्रामपंचायतीच्या सरपंचांना ग्रामसभा घेण्यासंदर्भात सूचना करण्यात आली होती. नीराच्या सरपंच तेजश्री काकडे यांनी यासंदर्भात सोमवारी (दि.९) सकाळी नऊ वाजता वाॅर्ड नंबर पाचमधील शिवतक्रारवाडी येथील भैरवनाथ मंदिराच्या प्रांगणात विशेष ग्रामसभेचे आयोजन केले होते. मात्र, वाॅर्ड नंबर पाचमध्ये असलेली बागायत शेती पाहता, या भागातील लोकांनी नीरा नगरपंचायत करण्यास जोरदार विरोध दर्शवला.
नीरा येथील इतर पाच वाॅर्डांमध्ये कुठेही जागा शिल्लक नाही. त्यामुळे जर नगरपंचायत झाली, तर आमच्या जमिनीवर आरक्षण टाकलं जाईल आणि आम्ही शेतकरी भूमिहीन होऊ, अशी भूमिका वाॅर्ड नंबर पाचमधील लोकांनी घेतली. वाॅर्ड नंबर पाचमधील लोकांची आक्रमकता पाहून इतर भागांतील लोकांनी गप्प राहणे पसंत केले. त्यामुळे सरपंच तेजश्री काकडे यांनी नीरा नगरपंचायत होण्यासंदर्भातील ठराव फेटाळण्यात येत असल्याचे जाहीर केले.या ग्रामसभेमध्ये प्रामुख्याने प्रकाश कदम, राजेश चव्हाण, महेश धायगुडे, कल्याण जेधे, सुदाम बंडागर, वैशाली बंडगर, विजय धायगुडे, सचिन धायगुडे, दादा लकडे यांनी नगरपंचायत विरोधात बाजू मांडली. तर ग्रामपंचायत सदस्य प्रमोद काकडे, अनिल चव्हाण, ग्रामस्थ महेश जेधे, युगेंद्र माने, तुकाराम जगताप, दयानंद चव्हाण यांनी नगरपंचायत होण्याच्या बाजूने मत मांडले. व्यापारी राजू शहा, माजी उपसरपंच बाळासाहेब भोसले, कल्याण जेधे यांनीही या चर्चेत सहभाग घेतला.
दोन सदस्यांची ग्रामसभेला दांडी
नीरा ग्रामपंचायतीच्या इतिहासामध्ये वॉर्ड नंबर पाचमध्ये पहिल्यांदाच ग्रामसभा घेण्यात आली. मात्र, या ग्रामसभेला या वाॅर्डातील तीन पैकी दोन सदस्यांनी दांडी मारली. त्यामुळे त्यांच्या अनुपस्थितीची मोठ्या प्रमाणात चर्चा झाली . यासंदर्भात अनुपस्थित सदस्य संदीप धायगुडे यांनी आपली बाजू मांडली आहे. ते म्हणाले की, नीराच्या उपसरपंचांनी जाणून-बुजून नगरपंचायत ठरावासंदर्भातील ग्रामसभा वाॅर्ड नंबर पाचमध्ये लावली. हा ठराव फेटाळला जाईल, हे त्यांना माहीत होते. नगरपंचायतीबाबतचा ठराव फेटाळला जाण्याचे खापर वाॅर्ड नंबर पाचमधील लोकांच्या डोक्यावर फोडण्यासाठी उपसरपंचांनी घातलेला घाट होता. त्यामुळे आम्ही या ग्रामसभेला उपस्थित राहिलो नाही.
नीरा नगरपंचायत होण्यासंदर्भात आज ग्रामसभा घेण्यात आली होती. या ग्रामसभेमध्ये एकमताने नगरपंचायत विरोधात ठराव संमत करण्यात आला आहे. यासंदर्भातील माहिती आम्ही उद्या जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती स्तरावर देणार आहोत. सध्या तरी लोकांचा नगरपंचायत करण्यास विरोध आहे. - तेजश्री काकडे, सरपंच, नीरा
नीरा येथील शहरी भागातील जमिनीचा सिटीसर्वे होणे आवश्यक आहे. नगरपंचायत झाली, तर हे सिटीसर्वे होईल. जमिनीचे प्रॉपर्टी कार्ड मिळेल. असे ग्रामस्थांना वाटत आहे, मात्र याला हद्द वाढ हा देखील एक पर्याय आहे. त्यामुळे हा जरी ठराव फेटाळला गेला असला, तरी नीराच्या शहरी भागातील जागेचा सिटीसर्वे होण्यासंदर्भात व वाढीव हद्द होण्यासंदर्भात आम्ही प्रयत्नशील आहोत. लोकांना कोणत्याही अडचणी येऊ नये, म्हणून आमचा प्रयत्न आहे. मात्र, लोकसंख्येचा विचार करता आज ना उद्या नीरा नगरपंचायत करावी लागणार आहे. - राजेश काकडे, उपसरपंच नीरा