हॅरी पॉटर, गेम ऑफ थ्रोन्ससारखी साहित्यनिर्मिती काळाची गरज
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2020 19:29 IST2020-03-11T19:26:03+5:302020-03-11T19:29:15+5:30
इतिहास हा कथा- दंतकथांमधून समाजापुढे जात असतो.

हॅरी पॉटर, गेम ऑफ थ्रोन्ससारखी साहित्यनिर्मिती काळाची गरज
पुणे : वाचकांची सांस्कृतिक भूक भागविण्यासाठी पाश्चात्त्यांसारखी नवीन विश्वाची निर्मिती करणारी मिथके काळाची गरज आहे. कारण, इतिहास हा कथा- दंतकथांमधून समाजापुढे जात असतो. हॅरी पॉटर, गेम ऑफ थ्रोन्स ही पाश्चात्त्यांची मिथकेच आहेत. अशा पद्धतीचे कथानक ‘रहस्य’ कादंबरीतून मांडले गेले आहे, असे मत ज्येष्ठ लेखक वसंत वसंत लिमये यांनी व्यक्त केले.
विश्वकर्मा पब्लिकेशनतर्फे गणेश महादेवलिखित ‘रहस्य’ कादंबरीच्या प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ लेखक संजय सोनवणी व घनश्याम पाटील उपस्थित होते. विश्वकर्मा प्रकाशनाचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल सोनी, संपादक मनोहर सोनवणी, सहसंपादक संदीप तापकीर हे उपस्थित होते.
वसंत वसंत लिमये म्हणाले, ‘‘प्रत्येक काळामध्ये समाजमनाला मिथकांची गरज असते. ताकदवान मिथके सांस्कृतिक जडणघडण करीत असतात. सध्याच्या भारतीय समाजाची ही गरज मिथकप्रधान साहित्यातून भागू शकते. ‘रहस्य’ कादंबरीने याकरिता महत्त्वाचे योगदान दिले आहे.’’
संजय सोनवणी म्हणाले, ‘‘महाराष्ट्रामध्ये सातवाहनकालीन राजांनी अनेक किल्ले बांधले. अशा प्राचीन वातावरणात कादंबरी वाचकाला घेऊन जाते. त्याचबरोबर वाचकाला अनेक मिथ्यांमध्ये घेऊन जाण्याचे कसब या कादंबरीत आहे.’’
घनश्याम पाटील यांनी रहस्य कादंबरीचे मर्म उलगडले. ते म्हणाले, ‘‘रहस्य कादंबरी वाचकाला एका वेगळ्या विश्वात घेऊन जाते. यातली मानवी पात्रेच नाही, तर जनावरेदेखील आपला ठसा उमटवून जातात. त्यामुळे कादंबरीतील जंगल, जनावरे, माणसे ही हजार तोंडांनी वाचकाशी बोलतात व एका वेगळ्याच दुनियेत वाचकाला घेऊन जातात.’’
लेखक गणेश महादेव यांनीही कादंबरीलेखनामागची भूमिका स्पष्ट केली. गुप्तधनासारखा विषय कादंबरीत जरी मांडला असला, तरीदेखील कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धांपासून वेगळा शुद्ध आध्यात्मिक विचार या कादंबरीतून मांडल्याचे ते म्हणाले.
कार्यक्रमाची सुरुवात कादंबरीवाचनाने झाली. योगेश काळजे, संतोष घुले, उमेश बागडे यांनी कादंबरीवाचन केले. प्रा. प्रदीप तामखडे यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले.
०००