माझे माहेर पंढरी..., गाण्याने पुणेकर मंत्रमुग्ध; काश्मीरच्या शमिमा अख्तरने आळवला पांडुरंगाचा राग
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2022 15:28 IST2022-06-14T15:28:13+5:302022-06-14T15:28:48+5:30
निमित्त हाेते, ‘काश्मीर आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हल’चे

माझे माहेर पंढरी..., गाण्याने पुणेकर मंत्रमुग्ध; काश्मीरच्या शमिमा अख्तरने आळवला पांडुरंगाचा राग
पुणे : वारकऱ्यांसह पुणेकरांनाही वारीचे वेध लागलेले असतानाच शमिमा अख्तर या काश्मिरी मुस्लीम तरुणीने ‘माझे माहेर पंढरी’ हे गाणे सादर करून पुणेकरांना मंत्रमुग्ध करून टाकले. निमित्त हाेते, ‘काश्मीर आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हल’चे. यात शमिमाने आळवलेला पांडुरंगाचा राग उपस्थितांच्या काळजात भिडला. तिच्या गोड आणि मनाला प्रसन्नता देणाऱ्या स्वरांनी वारीपूर्वीच चंद्रभागेच्या तीरी भक्तिमेळा रंगल्याची प्रचिती उपस्थितांना दिली.
आषाढी वारीसाठी श्रीक्षेत्र पंढरपूरकडे मार्गस्थ हाेण्यासाठी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी साेहळा सज्ज झाला आहे. तसेच राज्यभरातील भाविक पंढरीच्या दिशेने निघाले आहेत. पुणेकरांनाही पालखी साेहळा आगमनाचे वेध लागले आहेत. या पार्श्वभूमीवर शमिमा अख्तर हिच्या गाण्याने वातावरण भक्तिमय झाले.
दहशतवाद, अस्वस्थता अन् अशांततेला सामोरे जात असतानाच देशात धर्माधर्मांमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. अशा वेळी शमिमा ही तरुणी समाजाला ‘तिमिरातुनी तेजाकडे’ नेण्यासाठी पसायदानाबरोबरच संत रचनांमधून वैश्विक शांततेचा संदेश देऊ पाहत आहे, हे यातील वेगळेपण! विशेष म्हणजे, काश्मीरच्या नंदनवनात शमिमाचं बालपण फुललं असलं तरी तिचं माहेर आता पुणे झाले आहे.
काश्मीरच्या बांदिपुरा जिल्ह्यातल्या एका छोट्याशा गावातली ही मुलगी. आई, वडील आणि पाच बहिणी हे तिचं कुटुंब. काश्मिरी विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची कवाडे खुली करणारे सरहद संस्थेचे संस्थापक संजय नहार यांनी तिला पुण्यात आणले. तिच्या मधुर आवाजातून सर्वप्रथम सूर गुंजले ते ‘पसायदाना’चे! जगातील शांततेसाठी, प्रत्येक माणसाच्या सुखासाठी विश्वात्मकाकडे तिने पसाय‘दान’ मागितले. तिच्या त्या जादुई स्वरांनी सर्वच जण भारावून गेले नसते तरच नवल! शमीमा म्हणते, संगीताची कोणतीच भाषा नसते. मी ‘पसायदान’ म्हणते किंवा काश्मीरमध्ये दुवा मागते तेव्हा फक्त भाषेचा फरक आहे, असे वाटते. माझे आजोबा (दादाजी) काश्मीरमधले मोठे संत कवी होते. मावशी दूरदर्शनमध्ये गायिका होती. त्यामुळे गाणं सातत्याने कानावर पडत राहायचं. पण कधी दुसऱ्या शहरात येऊन गाईन असे वाटले नाही. मात्र, सरहद आर्ट फेस्टिव्हलनिमित्त मी २०१७ मध्ये पहिल्यांदा पुण्यात आले. आता कायमस्वरूपी इथंच राहणार आहे. नुकतंच माझं लग्न झालं आहे. इथंच आमचं घर आणि स्टुडिओ आहे. काश्मीरनंतर पुणे माझं दुसरं माहेर झालं आहे.
‘काश्मीर फाइल्स’ पाहिलाच नाही
मी काश्मीरमध्ये पंडितांच्या भागात राहत होते. आम्ही सर्व जण नेहमीप्रमाणे राहिलो. आई मला बाहेर दुसऱ्या ठिकाणी पाठवायला घाबरत होती. माझ्या वडिलांचे मित्र काश्मिरी पंडित होते, त्यांचे नाव रतनलाल आणि फुलनदेवी. त्यांना आम्ही ‘डॅडी’ आणि ‘ममा’ म्हणायचो. त्यांनी माझ्या आई-वडिलांना समजावले. आमच्या गल्लीला ओलांडून असलेले मंदिर मुस्लीम कुटुंबांनीच बांधले आहे. आजही तिथे काश्मिरी पंडित परत येतात, तेव्हा मुस्लीम कुटुंबांच्या घरी आवर्जून जातात. एकमेकांच्या गळ्यात पडून रडतातही. काश्मिरी मुस्लिमांनी हे सगळं केलं असतं तर ते मुस्लीम कुटुंबांना भेटायला गेले असते का? त्यामुळे ‘द काश्मीर फाइल्स’सारख्या चित्रपटांमध्ये चुकीचे चित्रीकरण दाखवून दोन धर्मांमध्ये द्वेष पसरविला जात आहे. म्हणून मी हा चित्रपट पाहिलाच नाही. एकमेकांच्या धर्माचा सन्मान करा आणि माणसांचा आदर करायला हवा, असेही शमीमा अख्तर सांगते.