मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर बोरघाटात झालेल्या गॅस टँकरच्या अपघातामुळे हजारो प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला. या घटनेची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अत्यंत गंभीर दखल घेतली असून, भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी तत्काळ विशेष आपत्कालीन वाहतूक आराखडा' तयार करण्याचे निर्देश एमएसआरडीसी आणि पोलीस प्रशासनाला दिले आहेत. तसेच, जोपर्यंत वाहतूक पूर्णपणे पूर्वपदावर येत नाही, तोपर्यंत या महामार्गावरील टोल वसुली थांबवण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत.
२० तासांचा थरार आणि आव्हानात्मक बचावकार्य
बोरघाटात प्रोपोलीन गॅसचा टँकर उलटल्यामुळे मोठ्या प्रमाणावर गॅस गळती सुरू झाली होती. हा वायू अत्यंत ज्वलनशील असल्याने मोठा स्फोट होऊन जीवितहानी होण्याची भीती होती. "प्रवाशांना झालेला त्रास दुर्दैवी आहे, पण तिथे जीवितहानी टाळणे हे आमचे पहिले कर्तव्य होते," असे उपमुख्यमंत्री म्हणाले. एमएसआरडीसी आणि पोलिसांनी सलग २० तास प्रयत्न करून ही गळती रोखली. या कामासाठी एनडीआरएफसहभारत पेट्रोलियम, हिंदुस्तान पेट्रोलियम आणि रिलायन्सच्या तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले होते.
प्रवाशांना दिलासा: टोल बंद अन् खाण्यापिण्याची सोय
वाहतूक कोंडीत अडकलेल्या प्रवाशांचे हाल होऊ नयेत म्हणून उपमुख्यमंत्र्यांनी टोल वसुली थांबवण्याचे निर्देश दिले. या काळात एमएसआरडीसीच्या कर्मचाऱ्यांनी रस्त्यावर उतरून प्रवाशांना पिण्याचे पाणी आणि बिस्किटांचे वाटप केले. परिस्थिती नियंत्रणात येईपर्यंत सर्व अधिकारी रस्त्यावरच ठाण मांडून होते.
'मिसिंग लिंक'चे काम युद्धपातळीवर पूर्ण करा!
एक्स्प्रेस वेवरील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी आणि अशा आपत्कालीन स्थितीत पर्यायी मार्ग उपलब्ध व्हावा म्हणून 'मुंबई-पुणे मिसिंग लिंक'चे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आदेश उपमुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. हे काम आता अंतिम टप्प्यात असून, ही लिंक सुरू झाल्यावर प्रवासाचा वेळ वाचण्यासोबतच घाट विभागातील वाहतूक कोंडीची समस्याही कायमची सुटण्यास मदत होणार आहे.
काय आहे नवीन आपत्कालीन आराखडा?
भविष्यात असे अपघात झाल्यास वाहतूक नेमकी कुठे वळवायची, पर्यायी मार्ग किती वेळात उपलब्ध करून द्यायचे आणि बचाव यंत्रणा किती वेगाने पोहोचतील, याचा सविस्तर आराखडा तयार करण्यास सांगण्यात आले आहे. "प्रवाशांची सुरक्षा आणि त्यांचा वेळ आमच्यासाठी महत्त्वाचा आहे," असे ठाम मत उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केले.
Web Summary : Following a gas tanker accident on the Mumbai-Pune Expressway, Deputy Chief Minister Eknath Shinde ordered an emergency plan, suspended toll collection, and expedited the 'Missing Link' project. The plan focuses on rerouting traffic and rapid emergency response to prevent future disruptions.
Web Summary : मुंबई-पुणे एक्सप्रेसवे पर एक गैस टैंकर दुर्घटना के बाद, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने एक आपातकालीन योजना का आदेश दिया, टोल संग्रह को निलंबित कर दिया, और 'मिसिंग लिंक' परियोजना में तेजी लाई। योजना भविष्य में व्यवधानों को रोकने के लिए यातायात को मोड़ने और तेजी से आपातकालीन प्रतिक्रिया पर केंद्रित है।