- नारायण बडगुजर पिंपरी : बेपत्ता पतीच्या तक्रारीत महिलेने पुरवणी जबाब दिला. त्यावरून पोलिसांच्या तपासाला दिशा मिळाली. याबाबत कुणकुण लागताच पतीच्या दोन मित्रांनी पुण्यातून पळ काढला. मात्र, पोलिसांनी त्यांच्या मुसक्या आवळून खून प्रकरणाची उकल केली.
वाकड पोलिस ठाण्याच्या हद्दीत थेरगाव परिसरातील ३० वर्षीय तरुण त्याच्या दोन जिवलग मित्रांसह ५ ऑक्टोबर २०२३ रोजी दारू पित बसला होता. त्यावेळी आई-बहिणीवरून शिवीगाळ केल्याने मित्रांनी चाकूने गळ्यावर वार करून तरुणाचा खून केला. त्यानंतर गोधडीत त्याचा मृतदेह गुंडाळून टेम्पोमधून बावधन येथे नेला.
तेथे गायकवाड वस्तीमधील महामार्गाखालील एका नाल्यात मृतदेह टाकून दिला. त्यानंतर काही घडलेच नाही, अशा आर्विभावात दोघे मित्र वावरत होते. दरम्यान, तरुण घरी न आल्याने त्याच्या पत्नीने बेपत्ता झाल्याची वाकड पोलिसांकडे ७ ऑक्टोबर २०२३ रोजी तक्रार केली. त्यानंतर पोलिसांनी तरुणाचा शोध सुरू केला. त्याचवेळी तरुणाच्या पत्नीला माहिती मिळाली की, तिचा पती दोन मित्रांसोबत दारू पिण्यासाठी गेला होता. त्यामुळे पत्नीने तिच्या पतीच्या दोन्ही मित्रांच्या घरी जाऊन त्यांच्याकडे चौकशी केली. मात्र, दोन्ही मित्रांनी हात झटकले. तुझ्या पतीबाबत आम्हाला काहीही माहिती नाही, असे त्यांनी सांगितले. त्यामुळे महिलेने पुन्हा वाकड पोलिस ठाणे गाठले. तिचा पती त्याच्या दोन मित्रांसोबत दारू पिण्यासाठी गेला होता, असा पुरवणी जबाब तिने ११ ऑक्टोबर २०२३ रोजी पोलिसांना दिला. त्यानंतर पोलिसांच्या तपासाला दिशा मिळाली.दरम्यान, तरुणाच्या बेपत्ता झाल्याची पोलिसांकडे तक्रार दाखल झाल्याबाबत दोन्ही मित्रांना माहिती मिळाली. त्यानंतर ८ ऑक्टोबर २०२३ रोजी तरुणाचे दोन्ही मित्र पुण्यातून पळून जाऊन बीड जिल्ह्यातील आंबेजोगाई या मूळगावी गेले. इकडे पोलिसांकडून दोन्ही मित्रांचा शोध घेण्यात आला. मात्र, ते मिळून येत नव्हते.तत्कालीन पोलिस उपायुक्त डॉ. काकासाहेब डोळे आणि सहायक पोलिस आयुक्त डॉ. विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली वाकड पोलिस ठाण्याचे तत्कालीन वरिष्ठ पोलिस निरीक्षक गणेश जवादवाड यांनी निरीक्षक विठ्ठल साळुंखे, तपास पथकाचे तत्कालीन सहायक निरीक्षक संतोष पाटील, उपनिरीक्षक सचिन चव्हाण यांचे पथक तयार केले. या पथकाने तांत्रिक विश्लेषण करून दोन्ही मित्रांची माहिती मिळवली. ते त्यांच्या मूळगावी असल्याचे समोर आले. वाकड पोलिसांच्या तपास पथकाने आंबेजोगाई येथे जाऊन संशयित दोन्ही मित्रांच्या मुसक्या आवळल्या.
बेपत्ता झाल्याच्या तक्रारीवरून तपास सुरू केला. त्यानंतर महिलेने पुरवणी जबाब दिला. त्यावरून तपासाला दिशा मिळाली. या प्रकरणाची उकल करणे सहज शक्य नव्हते. मात्र, तांत्रिक विश्लेषण, खबऱ्यांची माहिती अचूक होती. तसेच, संशयित दोन्ही मित्रांकडे कसून केलेला तपास यामुळे खून प्रकरण समोर आले. - संतोष पाटील, पोलिस निरीक्षक (तत्कालीन सहायक निरीक्षक)