Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi 2025: माऊली निघाले विठुरायाच्या भेटीला; लाखो वैष्णवांचा मेळा पंढरीच्या वाटेवर, आज पुण्यात आगमन
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2025 10:02 IST2025-06-20T10:01:39+5:302025-06-20T10:02:59+5:30
sant dnyaneshwar maharaj palkhi 2025 आषाढी पायीवारी पालखी सोहळ्याने शुक्रवारी सकाळी सव्वा सातच्या सुमारास लाखो वैष्णवांसह अजोळघरातून पंढरीचा मार्ग धरला

Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi 2025: माऊली निघाले विठुरायाच्या भेटीला; लाखो वैष्णवांचा मेळा पंढरीच्या वाटेवर, आज पुण्यात आगमन
भानुदास पऱ्हाड
आळंदी : श्री. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउलींच्या आषाढी पायीवारी पालखी सोहळ्याने शुक्रवारी (दि.२०) सकाळी सव्वा सातच्या सुमारास लाखो वैष्णवांसह अजोळघरातून पंढरीचा मार्ग धरला. प्रस्थानपूर्वी मध्यरात्री माउलींच्या आजोळी पादुकांना रुद्राभिषेक करून पंचामृत पूजा, पंच्चपक्व्वान्न नैवद्य, आरती, पसायदान घेण्यात आले.
संपदा सोहळा नावडे मनाला
लागला टकळा पंढरीचा !!
जावे पंढरीशी आवड मनाशी !
कधी एकादशी आषाढीई !!
तुका म्हणे एशे आर्त ज्यांचे मनी !
त्यांचे चक्री पाणी वाट पाहे !!अशाच पद्धतीची भावना अलंकापुरीत दाखल झालेल्या सर्व वारकऱ्यांमध्ये दिसून येत होती. गुरुवारी रात्री उशिरा अजोळघरात विसावलेल्या या सोहळ्यात माऊलींच्या पादुकांचे लाखो वारकऱ्यांनी सहज व सुलभ दर्शन घेतले. तत्पर्वी गुरुवारी (दि.१९) रात्री पावणे अकरा वाजण्याच्या सुमारास सुमारास माऊलींच्या पालखीने मंदिरातून प्रस्थान ठेवले. मानकरी व ग्रामस्थांच्या खांद्यावरील मंदिर प्रदक्षिणा व प्रथेप्रमाणे चक्रांकित महाराजांच्या पूजेनंतर सोहळा पहिल्या मुक्कामी नवीन दर्शनबारी मंडपात (आजोळघरी) विसावला होता.
प्रस्थान सोहळ्यादरम्यान बंद केलेली दर्शनरांग प्रस्थानानंतर मोठ्या गतीने नव्याने बांधण्यात आलेल्या दर्शन मंडपात दर्शनासाठी आत घेण्यात येत होती. माउलींच्या दर्शनसाठी दिवसभर लांबच - लांब रांगा लागलेल्या असतानाही रात्री प्रस्थान सोहळ्यानंतर दर्शनासाठी भाविकांच्या रांगा वाढत होत्या.
धन्य आज संत दर्शनाचा !
अनंत जन्मीचा शिण गेला !!
मज वाटे त्यांशी अलीगन द्यावे !
कदा न सोडावे चरण त्यांचे !! या अभंगाप्रमाणे प्रत्येक वारकरी माऊलींचे दर्शन घेण्यासाठी कासावीस होऊन त्यांच्या चरणावर माथा ठेकून स्वता:ला धन्य करून घेत होता. संपूर्ण अलंकापुरी चैतन्यमय, धार्मिक वातावरणात दंग झाली होती. शुक्रवारी पहाटे साडेपाच वाजता परंपरेनुसार शितोळे सरकारांचा माउलींच्या पालखीला नैवद्य दाखविण्यात आला. साडे सहाच्या दरम्यान शितोळे सरकारांचे अश्व अजोळघरी आणून त्यांना मानपान देण्यात आले. त्यानंतर माउलींची पालखी आळंदी ग्रामस्थ व मानकऱ्याच्या खांद्यावर घेऊन नगरपालिकेसमोर सजविलेल्या रथात विराजमान करण्यात आली.
पालखीचे रथाचे सारथ्य बैलजोडीचे मानकरी तसेच पालखी सोहळा प्रमुख एड. भावार्थ देखणे, प्रमुख विश्वस्त योगी निरंजननाथ, विश्वस्त ऍड. राजेंद्र उमाप, चैतन्य लोंढे, पुरुषोत्तम पाटील, कॉलनी पवार आदींनी केले. याप्रसंगी सोहळा मालक आरफळकर, शितोळे सरकार, मुख्याधिकारी माधव खांडेकर, माऊलींचे मानकरी, आळंदीकर ग्रामस्थ व वारकरी - भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वाजत - गाजत हा पालखी सोहळा धाकट्या पादुका व त्यानंतर साईमंदिरासमोर थोरल्या पादुकांशेजारी जाऊन विसावेल. थोरल्या पादुका मंदिरात अध्यक्ष ऍड. विष्णू तापकीर यांच्या हस्ते विधिवत आरती घेण्यात येईल. आरतीनंतर पालखी पुण्याच्या दिशेने मार्गस्थ होईल. नवमी व दशमीला हा सोहळा पुण्यात भवानी पेठ, तर एकादशी व बारशीला सासवडनगरीत मुक्काम करणार आहे. दरम्यान केंदूर (ता.शिरूर) येथील श्री. संतश्रेष्ठ कान्होराज महाराजांची पालखी सकाळी सहाला पुण्याकडे मार्गस्थ झाली.