शेतकऱ्यांची चेष्टा करणाऱ्या कोकाटेंनी राजीनामा द्यावा; पुण्यातून काँग्रेसची मागणी
By राजू इनामदार | Updated: May 30, 2025 16:19 IST2025-05-30T16:10:48+5:302025-05-30T16:19:35+5:30
असंवेदनशील कृषीमंत्र्याला मुख्यमंत्र्यांनी तातडीने घरचा रस्ता दाखवावा व महसूल यंत्रणेला आदेश देत नुकसानीत गेलेल्या पिकांचे पंचनामे करायचे आदेश द्यावेत

शेतकऱ्यांची चेष्टा करणाऱ्या कोकाटेंनी राजीनामा द्यावा; पुण्यातून काँग्रेसची मागणी
पुणे: अवकाळी पावसाने शेतकऱ्यांची अतोनात नुकसान केलेले असताना राज्याचे कृषीमंत्री माणिक कोकाटे, सरकारने काय मातीचे व मोकळ्या वावराचे पंचनामे करायचे का? असा प्रश्न करत आहेत. शेतकऱ्यांप्रती अशी असंवेदनशीलता दाखवणाऱ्या कोकाटे यांचा सरकारने राजीनामा घ्यावा अशी मागणी काँग्रेसने केली. भ्रष्टाचाराने बरबटलेल्या व त्याबद्दल न्यायालयाने शिक्षा सुनावलेल्या कोकाटे यांना शेतकऱ्यांचे दु:ख कळणार नाही असे काँग्रेसने म्हटले आहे.
पक्षाचे प्रदेश प्रवक्ते हनुमंत पवार म्हणाले, ”राज्यात पावसाने धुमाकुळ घातला. राज्याच्या जवळपास सर्वच भागातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. अशा वेळी सरकारने सर्व महसूल यंत्रणांना त्वरीत पंचनामे करायला सांगणे गरजेचे असते. त्यामुळेच शेतकऱ्यांना किती नुकसान भरपाई द्यायची ते निश्चित करता येते. त्याबाबत निर्णय घेण्याऐवजी कोकाटे यांनी सरकारने काय मोकळ्या वावरांचे व मातीचे पंचनामे करायचे का? असे जाहीर वक्तव्य केले.“ अशा असंवेदनशील कृषीमंत्र्याला मुख्यमंत्र्यांनी तातडीने घरचा रस्ता दाखवावा व महसूल यंत्रणेला आदेश देत नुकसानीत गेलेल्या पिकांचे पंचनामे करायचे आदेश द्यावेत अशी मागणी पवार यांनी केली.
नेमकं काय म्हणाले कोकाटे?
वळवाच्या पावसाने महाराष्ट्र राज्यात हजारो हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. यात शेतातून काढून ठेवलेल्या आणि काढणीवर आलेल्या दोन प्रकारच्या कांद्याचाही समावेश आहे. शासकीय यंत्रणा उभ्या पिकाचे पंचनामे करीत असल्याच्या तक्रारींवर कृषिमंत्री ॲड. कोकाटे यांनी भाष्य केले. कापणी झालेल्या पिकांचे पंचनामे करून काय करणार, ढेकळांचे पंचनामे करायचे का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. घरात आणून ठेवलेल्या मालाचे पंचनामे करता येणार नाहीत. शेतात नुकसान झालेले कांदा आणि अन्य जी पिके असतील, त्यांचे रितसर पंचनामे केले जातील, असे त्यांनी स्पष्ट केले होते.